गडचिरोली : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम मरकणार येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस पोहोचल्याने नागरिकांनी आनंद साजरा केला. १६ जुलै रोजी गडचिरोली पोलीस दल व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या प्रयत्नांनी मरकणार ते अहेरी बस सेवेला प्रथमच सुरुवात करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील अबुझमाडच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम मरकणार या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस आल्यामुळे या भागातील नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकावत जल्लोषात बसचे स्वागत केले. मरकणारचे गाव पाटील झुरु मालु मट्टामी यांनी सदर बस सेवेचे उद्घाटन केले. यावेळी सीआरपीएफ ३७ बटालियनचे असिस्टंट कमांडंट अविनाश चौधरी, कोठीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिलीप गवळी यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. यावेळी पोलीस दलामार्फत उपस्थित नागरिकांमध्ये मिठाईचे वाटप करुन आनंद व्यक्त करण्यात आला.

बससेवा सुरु झाल्यामुळे या भागातील मरकणार, मुरुमभुशी, फुलणार, कोपर्शी, पोयारकोठी, गुंडूरवाही या गावातील जवळपास १२०० हुन अधिक नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, प्रवासी यांना लाभ होणार आहे. सदर मार्गावरील एसटी बसच्या सुविधेमुळे गावकऱ्यांना वर्षभर सहज प्रवास करता येईल. तसेच पोलीस व नागरिक यांच्यातील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होईल. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुळ राज जी. पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

मरकणारमध्ये नक्षल्यांना गावबंदी

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या नागरी कृती उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मरकणार गावातील नागरिकांनी एकमताने ९ फेब्रुवारी २०२५ रोजी नक्षल गावबंदी ठराव पारीत करुन त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, असे घोषित केले होते. या अतिदुर्गम भागातील नागरिकांचा विकास होण्यासाठी गतवर्षी पोलीस संरक्षणामध्ये कोठी ते मरकणार रस्ता तयार करण्यात आला.

मरकणार ते मुरुमभुशी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी मरकणार गावात एअरटेल टॉवरचे बांधकाम करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांसाठी यापुर्वी कोणत्याही प्रकारची प्रवासाची सुविधा उपलब्ध नसल्यामूळे मरकणार तसेच आसपासच्या गावातील नागरिकांना कोठीपर्यंत पायी जाऊन बससेवेचा लाभ घ्यावा लागत होता.

पोलीस संरक्षणात ६० पुलांचे बांधकाम

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहूल व नक्षलवादग्रस्त म्हणून ओळखला जातो. दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करावी लागते.अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याच वर्षी १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी बस सेवा तसेच २७ एप्रिल २०२५ रोजी कटेझरी ते गडचिरोली बससेवा देखील सुरु करण्यात आली. दुर्गम भागात मागील पाच वर्षांमध्ये ४२० किमी लांबीच्या एकूण २० रस्त्यांसोबतच एकूण ६० पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करण्यात आले.