बुलढाणा: मोबाईल वरून बहिणीशी का बोलतो अशी विचारणा करीत पाच जणांनी  एका युवकासह त्याच्या मित्रास डांबून ठेवले. एवढेच नव्हे तर दोघांच्या गळ्याला तलवार लावत ठार मारण्याची धमकी दिली. तिथून सुटका झाल्यावर  युवकाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. यावरून शेगाव पोलिसांनी पाच आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. शेगाव येथील म्हाडा वसाहत मध्ये हा थरारक घटनाक्रम घडला.

राहुल रमेश शिरसागर (वय २२ वर्षे, राहणार व्यंकटेश नगर, शेगाव, जिल्हा बुलढाणा) याने प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार राहुल व आरोपीची बहीण  हे मागील आठ दहा दिवसापासून दिवसांपासून एकमेकांसोबत फोनवर बोलत होते . दरम्यान राहुलला  त्या युवतीचा (आरोपीच्या बहिणीचा) इंस्टाग्राम वर कॉल आला  परंतु  कामात असल्याने त्याने  फोन घेतला नाही. त्यानंतर युवकाने  तिला फोन केला असता तो  तिच्या आईने उचलला होता. त्यामुळे  ‘राँग नंबर’ म्हणून फोन बंद केला.

यानंतर लगेच युवतीचा  भाऊ  हा  राहुलचा मित्र कृष्णा गोपाल पाटेकर याच्या पानपट्टीवर आला.त्याने राहुल व कृष्णाला आपल्या घरी बोलाविले. हे दोघे दुपारी  घरी गेले असता  युवतीच्या आई व भावाने फोन का करता अशी विचारणा करीत म्ह राहुल व कृष्णाला  मारहाण केली. त्यानंतर  दोघांना  वरच्या खोलीत कोंडले. तिथेही दोघांना सतत मारहाण करण्यात आली.  त्यानंतर  तिथे आलेल्या तिघा नातेवाईकांनी   मारहाण करुन  शिवीगाळ केली.  तसेच तलवारीने कापून मारुन टाकू अशी धमकी दिली.  राहुल व कृष्णाच्या गळ्याला  तलवार  लावली.  मात्र याचवेळी युवतीच्या  वडिलांनी फोन करून,   ‘दोघांना सोडून द्या काही करू नका,’  असे सांगितले. त्यामुळे  युवकांना सोडून दिले.

दरम्यान राहुल याने शेगाव शहर पोलीस ठाणे गाठले. त्यावरून पोलिसांनी  आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपीविरुद्ध  भारतीय न्याय संहितेच्या कलम १४० (२),१४२,११५ (२),३५२,३५१ (२) ,३५१(३), ३(५),शस्त्र अधिनियमच्या कलम ४, २५, मुंबई पोलीस कायद्याच्या  कलम १३५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक अमित तळोले करीत आहे.