चंद्रपूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कृषी प्रधान भारत देशात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दरवर्षी लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेतमालाला भाव नाही, शेती साहित्य, खते, कीटकनाशके यावर वारेमाप जीएसटी, कर्जाचे थकलेले हप्ते, दुष्काळग्रस्तांना तुटपुंजी मदत, शेतकरी आंदोलनाची दखल न घेणे तसेच सर्वत्र वाढलेली गुंडगिरी यामुळे जनता त्रासली आहे. आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी यासाठी जिल्हा कॉग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्य सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी बांधव हा अकारण भरडला जात आहे. त्यामुळे कृषिप्रधान भारताचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने शासनाने तातडीने पुर्ण करावीत यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी सन्मान धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टिका केली. जिल्हातील सहाही विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर प्रहार केला. सरकार विरोधात आणि शेतकरी, गोरगरीब जनतेच्या न्यायासाठी घोषणा करण्यात आल्या. लाडकी बहिण, संजय गांधी निराधार योजनेतून निकष लावून अनुदान बंद करणे, देशात – राज्यात वाढता गुंडाराज, अराजकता, महापुरुषांचा अपमान, महिला सुरक्षा धोक्यात, वाढती महागाई, बेरोजगारी, भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात अशा अनेक समस्या आवासून उभ्या आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून केंद्र व राज्य सरकारने आश्वासनपुर्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभारून न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करेल असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. आंदोलनात निरीक्षक मुजीब पठाण, शहराध्यक्ष रीतेश तिवारी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिह गौर, विनोद दत्तात्रय, चंदा वैरागडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, दिनेश चोखारे, संतोष लहामगे, सुनीता लोढीया, घनश्याम मुलचंदाणी, अरुण धोटे, विजय बावणे, भालचंद्र दानव, तालुकाध्यक्ष अनिल नरुले, नितीन गोहणे, उत्तमराव पेचे, रंजन लांडे, मिलिंद भोयर, विलास टिपले, प्रा. अनिल शिंदे, राजु रेड्डी, एजाज अहमद, घनश्याम येनुरकर, राकेश रत्नावार, कुणाल चहारे, सुलतान अशरफ अली, प्रशांत दानव, अनु देहेगावकर, यासह महिला तालुकाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस, जिल्हा शहर काँग्रेस तथा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Millions of farmers commit suicide every year due to wrong government policies rsj 74 amy