नागपूर: मराठा आरक्षणावरून या सरकारने रस्त्यावरचे भांडण चव्हाट्यावर आणले आहे. मंत्रालयात बसून ओबीसी आणि मराठ्या नेत्यांना सोबत घेत हा प्रश्न सोडवता आला असता. परंतु सरकारला हे करायचे नव्हते. त्यामुळे भाजपने जाती- जातीत लावलेली आग हे सामाजिक कलंक आहे, अशी टीका काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवन परिसरात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाना पटोले म्हणाले, भाजपने मराठा धनगर आणि वेगवेगळ्या जातींना आरक्षणाचे गाजर दाखवून प्रत्यक्षात काही केले नाही. परंतु आता या भाजप- शिंदे सरकारला सभागृहात हे उत्तर द्यावे लागेल.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज जसे सुरतला गेले होते तसे आम्हीही सुरतला गेलो होतो. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज सुरतला लुटलेला खजिना परत आणण्यासाठी गेले होते. परंतु हे गुलामगिरीसाठी गेले. त्यांना कस्टडीत ठेवण्यात आले होते. त्यातला एका नेत्याला दूरचित्रवाणीवर विचित्र हलतान- डोलताना लोकांनी बघितले.

हेही वाचा… ‘यलो मोझॅक’मुळे सोयाबीनचे उत्पादन घटले, ४९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका

अजित पवारांनी पीएचडी संदर्भात केलेले वक्तव्य हे शैक्षणिक व्यवस्थेच्या विरोधात भाजप सरकार आहे हे दर्शविणारे आहे आणि हा माजही त्यांच्या वर्तनातून आणि बोलण्यातून दिसतो, असेही पटोले म्हणाले. केंद्र सरकार सर्वच सहकारी संस्था आणि शासकीय संस्थांमध्ये स्वत:चा हस्तक्षेप वाढविला आहे. सगळ्या गोष्टी आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचे हे प्रयत्न योग्य नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole criticised bjp over maratha reservation nagpur mnb 82 dvr