वर्धा: समृद्धी महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा, असे समीकरण ठरल्याची चर्चा असते. हा नको, अन्य मार्गावरून चला अशी सावधगिरी घेणे सूरू झाले होते. मोठा अपघात झाला की शासन पातळीवर दखल घेतल्याचे चित्र उमटत असे. पण आता खास समृद्धीसाठी पोलीस चमू स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. गृह राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी पुढाकार घेत हा अंमल केला. तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पण त्यांनी दिलेत.
नागपूर- मुंबई समृद्धी मार्गावर वाढलेली वाहनांची संख्या, वाहन चालकांकडून होणारी नियमांची पायमल्ली व यातून दररोज होणा-या अपघातांना आळा घालण्यासाठी मार्गावर १५ ठिकाणी पोलिस मदत केंद्र उघडण्यात येणार आहे. या संदर्भातील कार्यवाहीचा राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आढावा घेत संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या.विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर यांच्या कार्यालयात आज सोमवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला नागपूर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता एन एस अन्सारी, पोलिस अधीक्षक महामार्ग वाहतूक पोलिसचे ठाणे, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, कार्यकारी अभियंता सुरेश अभंग,अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंतराव सोळंके, संबंधित अधिकारी प्रत्यक्ष व आभासी पद्धतीने उपस्थित होते.गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी संबंधित अधिका-यांकडून संपूर्ण प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. राज्यातील राष्ट्रीय व राज्य मार्गवर ५३ मदत केंद्र व १३ सहाय्यता केंद्र कार्यान्वित आहे. या केंद्रामार्फत वाहन चालकांना मदत व सहकार्य केल्या जाते. समृद्धी महामार्ग वाहनांची गती १२० किमी प्रती तास ठेवण्यात आली असली तरी चालक यापेक्षा अधिक वेगाने वाहने चालवितात.
मात्र समृद्धी महामार्गसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने बेदकारपणे वाहन चालविणा-यांना आळा घालणे शक्य नसल्याने आता पोलिस मदत केंद्र स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सध्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात २७ अधिकारी व १४७ अंमलदार यांची नियमितपणे दैनदिन कर्तव्याकरिता नेमणूक करण्यात आली. परंतु मनुष्यबळ कमी असल्याने त्यांच्यावर प्रचंड ताण येत असल्याचे सांगण्यात आले.तथापि, वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी १५ पोलिस मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
समृद्धी महामार्गावरील वायफळ, येळाकेळी, धामणगांव, गावनेर शिवणी, कारंजा लाड,मालेगांव जहांगीर, दुसरबीड, सिंदखेड राजा, जालना, छत्रपती संभाजी नगर, हडस- पिंपळगांव, शिर्डी, सिन्नर, इगतपुरी, शहापूर येथील पोलिस मदत केंद्र व छत्रपती संभाजी नगर येथे नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रासाठी एक एपीआय, दोन पीएसआय, तीन एएसआय, अठरा पोलिस शिपाई व तीन वाहन चालक असे एकूण ३७ अधिकारी व कर्मचारी लागणार आहे. १५ पोलिस मदत केंद्र व एक नियंत्रण कक्षासाठी १६ एपीआय, ३२ पीएसआय, ४८ एएसआय, २७६ शिपाई व ४८ चालक असे एकूण ४२० कर्मचारी लागणार आहे.
प्रत्येक केंद्रासाठी चारचाकी वाहन,मोटरसायकल ,स्पीडगन ,टिंटमीटर ,ब्रेथ अॅनालायझर , मोबाईल फोन, संगणक, प्रिंटर, टेलिव्हिजन, डिजीटल बिनतारी संच, डिजीटल रिपीटर संच, वॉकी टॉकी, वायरलेस टावर सह अन्य साधन सामुग्री लागणार आहे.निर्धारीत करण्यात आलेल्या ठिकाणी तीन हजार चौ.फृ.टाचे पोलिस मदत केंद्र उभारण्यात येत आहे.
गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पोलिस मदत केंद्राचा विस्तृत आढावा घेतल्या नंतर पोलिस मदत केंद्राचे बांधकाम तातडीने बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित पोलिस अधीक्षकांनी मदत केंद्रासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सदर कार्य महत्वपूर्ण असल्याने प्राधान्यक्रमाने करण्यात यावे,अशी सूचना डॉ. भोयर केली.