यवतमाळ : जिल्ह्यात आज सात विधानसभा मतदारसंघात उत्साहात मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ६१.२२ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी हाती येईपर्यंत किमान ७० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ९ वाजेपर्यंत ७.१७ टक्के मतदान झाले होते. वणी विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यापासून मतदानाची टक्केवारी वाढती राहिली. सकाळी ११ वाजेपर्यंत १९.३८ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३४.१० टक्के, दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.८१ तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६१.२२ टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे मतदानाची अंतिम आकडेवारी ७० टक्केच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – कराळे मास्तरला चोपले; भाजप कार्यकर्त्यांशी वाद भोवला…

सकाळी उत्साहात सुरू झालेले मतदान १० वाजतानंतर काहीसे मंदावले. मात्र, दुपारी पुन्हा जोमाने मतदानास सुरवात झाली. ग्रामीण भागात, शहरातील गजबजलेल्या मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत यवतमाळ विधानसभा मतदारसंघात ५३.४० टक्के, आर्णी ६२.०७ टक्के, दिग्रस ६५.३३, पुसद ५७.७२, राळेगाव ६७.७५, उमरखेड ६०.३८, तर वणी विधानसभा मतदारसंघात ६३.७३ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान राळेगाव विधानसभा मतदारसंघात झाले तर सर्वात कमी मतदान यवतमाळमध्ये झाले. मतदानादरम्यान काही किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात १०२ उमेदवार रिंगणात असून आज मतदान करताना सर्वच उमेदवारांनी स्वत:च्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. आता मतदार कोणाच्या पारड्यात विजयाचे मत टाकतात, हे शनिवारी स्पष्ट होईल. मतदान संपताच सर्वत्र कोण निवडून येईल, याचे अंदाज बांधणे सुरू झाले आहे. महायुती की, महाविकास आघाडी याची चर्चा गावागावात रंगली आहे.

हेही वाचा – बुलढाण्यात मतदान उत्साहात; ३ वाजेपर्यंत ४३.६४ टक्क्यांपेक्षा जास्त…

गावात काही काळ तणाव

उमरखेड तालुक्यातील सुकळी (ज.) येथील भाजपचे सरपंच शिवाजी रावते यांच्यावर तेथील विशिष्ट समुदायाच्या तरुणांनी मतदान केंद्रावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात रावते गंभीर जखमी झाले. घटनेची तक्रार उमरखेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हा हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. राजकीय वैरातून हा हल्ला झाल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सुकळी हे संवेदनशील गाव आहे. त्यामुळे ही घटना घडताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या घटनेने गावात काही काळ तणाव पसरला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarpanch attacked in umarkhed average voter turnout in yavatmal district is 61 percent nrp 78 ssb