लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा: लग्न हे जीवनात एकदाच होत असत, म्हणून प्रत्येकाला वाटत की ते खास असावं. अलीकडे हटके पद्धतीने लग्नसोहळा करण्याकडे तरुणांचा कल असतो. त्यातल्या त्यात विवाह मंडपात पाहुण्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नववधू अनोख्या शक्कल लढवताना दिसतात. लक्षवेधी प्रयोग करून विवाह मंडपात एन्ट्री करतात. त्यासाठी बक्कळ पैसाही खर्च केला जातो. मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे एक असा विवाह सोहळा पार पडला ज्यात पैशांची कुठेही उधळपट्टी न करता नवरीनं विवाह समारंभात चक्क भारतीय संविधान हातात घेऊन वाजत गाजत दिमाखदार एन्ट्री केली आणि उपस्थित पाहुण्या मंडळीचं मनं जिंकून घेतलं. सध्या हा आदर्श विवाह सोहळा कौतुकाचा विषय ठरत आहे.

लाखनी तालुक्याच्या पोहरा गावातील तरुणी प्रांजल धनराज बडोले हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला. दोघेही पत्रकार आहेत. प्रांजल ही लोकसत्ता.कॉम परिवारातील आहे. विचाराने प्रगल्भ असलेल्या या नवविवाहीत दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्षी मानून आदर्श विवाह पार पाडण्याचा विचार केला आणि तो अमलातही आणला. तथागत गौतम बुध्द आणि भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून विवाह सोहळ्याला सुरुवात केली. त्यानंतर भारतीय संविधानाला साक्षी मानून स्वातंत्र्य, समता, आणि बंधूता या संविधानिक तत्वप्रणालीचा अंगीकार करत सध्म्मात जिवन जगण्याचा संकल्प देखील त्यांनी केलाय.

हेही वाचा… बुलढाणा : काँग्रेसचे मिशन-४२! प्रदेश समितीचे मुंबईत बुलढाण्यासह विदर्भातील नेत्यांशी विचारमंथन; बैठक लोकसभाचा ठरणार ट्रेलर

या विवाह सोहळ्याचं पुन्हा एक खास आकर्षण म्हणजे डॉ. बाबासाहेबांनी व्ही. एस. कर्डकांना आदर्श बौध्द विवाह समारंभ कसा असावा यासंदर्भात ४ डिसेंबर १९५६ मध्ये पत्र लिहिलं होतं. त्याच पत्राला उद्देशून या आदर्श विवाह सोहळ्याचं आयोजन केल होतं. या विवाह सोहळ्याला बौद्ध भिक्खू नाथ पुन्नो, बौद्ध धम्माचे प्रचारक प्रा. सुभाष शेंडे, उपासिका नीता डोंगरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The newly wedded couple had a perfect marriage witnessing the indian constitution in bhandara ksn 82 dvr