नाशिक – जिल्ह्यातील अनेक भागात पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झाल्याने हवालदिल शेतकऱ्यांसह नागरिकांना धीर देण्यासाठी आता मंत्री, आमदार, खासदार पुढे सरसावले आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातही पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांची तसेच मालमत्तेची हानी केली आहे. मंत्री भुजबळ यांनी मतदारसंघात झालेल्या नुकसानीची पाहणी करताना नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत करण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना केली.

नाशिक जिल्ह्यात २२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी मालेगाव, नांदगाव, सुरगाणा आदी भागातील पिकांना जबर फटका बसला. या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच शनिवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्याला पुन्हा झोडपून काढले. जिल्ह्याच्या बहुतांश भागात रात्रभर संततधार सुरू राहिली.

रविवारी देखील अनेक भागात पाऊस झाला. जिल्ह्याच्या १५ तालुक्यांमध्ये एकूण ११७ महसूल मंडळ आहेत. त्यापैकी ९८ मंडळांमध्ये २४ तासात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील नांदगाव, देवळा, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, नाशिक, सुरगाणा या तालुक्यांतील संपूर्ण गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली. येवला तालुक्यातील एकूण आठ महसूल मंडळांपैकी सात मंडळात २४ तासांत अतिवृष्टी झाली. नैसर्गिक संकटात शेतकरी आणि नागरिकांना कोणीतरी येऊन धीर देणे महत्वाचे असते.

मंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातील पूरग्रस्त भागाची अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीत प्रत्येक विभागांच्या प्रमुखांनी कार्यालयात उपस्थित राहून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी दिली. आपत्तीग्रस्त कुटुंबांना १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ, तसेच गहू नको असतील, त्यांना तेवढेच तांदूळ वाटप करावेत, प्रति कुटुंब तीन किलो डाळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आवश्यकतेनुसार आपपत्तीग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवून निवारा उपलब्ध करून देण्यास सांगितले. लोकांचे जीव वाचविण्यास आपले प्राधान्य आहे. त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. येवला तालुक्यातील अंदरसुल येथे कोळगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या भागात मंत्री भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी केली.

त्यानंतर येवला शहरातील हुडको कॉलनीतील घरांमध्ये पाणी शिरल्याने उदभवलेल्या परिस्थितीची पाहणी केली. सावरगाव, पाटोदा तसेच निफाड तालुक्यातील पाचोरा, मरळगोई, लासलगाव, टाकळी विंचूर येथेही पाहणी केली. मंत्री भुजबळ यांनी केलेल्या सूचनांनुसार कितपत काम होते, याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे.