जळगाव – जिल्ह्यात १६७ पैकी १५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह ३१ गावांतील रिक्त सदस्यपदाच्या ५१, तर सरपंचपदाच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपा-शिंदे गटाने सर्वाधिक ग्रामपंचायतींत विजय मिळविल्याचा दावा या पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपाचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अजित पवार गटाचे नेते तथा मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, तसेच शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यासह माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी आदी नेत्यांच्या प्रतिष्ठेचा कस या निवडणुकीत लागला. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक मुद्दे अधिक प्रभावी ठरतात. या निवडणुकांमध्ये बहुसंख्य ठिकाणी एकाच पॅनलमध्ये विविध पक्षांच्या समर्थकांचा समावेश असतो. त्यामुळे कोणत्या पक्षाने वर्चस्व मिळविले हे सांगणे अवघड असले तरी पक्षांचे पदाधिकारी, नेते यश आपल्यालाच मिळाल्याचा दावा करत आहेत.

हेही वाचा – कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी समाजाकडून सतर्कतेची गरज; स्त्री: व्यक्त-अव्यक्त पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मृदुला भाटकर

जिल्ह्यात यापूर्वीच १६ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात भडगाव तालुक्यातील दोन, अमळनेरमधील एक, चाळीसगावातील दोन, चोपड्यातील दोन, जळगावातील दोन, पारोळ्यातील दोन, यावलमधील एक आणि धरणगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यापूर्वीच पोटनिवडणुकीतील १९ सरपंचांसह ४७१ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. १९ ठिकाणी सरपंचपदाची बिनविरोध निवड झाली असून, त्यांपैकी सहा ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व राहिले आहे. शरद पवार गटाला तीन, भाजपाला तीन, अजित पवार गटाला एक, ठाकरे गटाला दोन व सर्वपक्षीय तीन व एक अपक्ष असे चित्र आहे.

शिंदे गटाचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील मतदारसंघातील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात जामनेर तालुक्यात २३ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली.

जिल्ह्यात भाजपा व शिंदे गटाचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचे सांगण्यात येते. शिंदे गटाकडे ३५, भाजपाकडे ३५, अजित पवार गटाला पाच आणि उद्धव ठाकरे गटाला पाच ग्रामपंचायतींवर विजय मिळविता आला, तर काँग्रेसला दोन व शरद पवार गटाला सात ग्रामपंचायतींत यश मिळाले. दहा ग्रामपंचायतींत अपक्ष सदस्यांची निवड झाली आहे.

हेही वाचा – मालेगाव: वृध्देच्या मृत्युप्रकरणी जन्मठेप

जामनेर तालुक्यातील गारखेडा ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळविले आहे. यावल तालुक्यातील गिरडगाव येथे सर्वपक्षीय सरंपच, तर अमळनेर तालुक्यातील दोधवदसह पिंपळे खुर्द ग्रामपंचायतीवर सर्वपक्षीय सत्ता आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींवर भाजपाने वर्चस्व मिळविले आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष लागले होते. जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे गटाने यश मिळविले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार जळगाव ग्रामीणमध्ये ३४ पैकी २९ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा भगवा ध्वज फडकला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti claims to have won the maximum number of gram panchayats in jalgaon district ssb