जळगाव: लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातील सहाच्या सहा जागांवर महायुतीचा विजय होईल. देशात तो विक्रम ठरेल, असा दावा भाजपचे नेते ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. जामनेर तालुक्यात वादळी वार्यासह पावसामुळे केळीबागांसह शेतीपिके, घरे, गोठ्यांचे मोठे नुकसान झाले. रविवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणीवेळी ग्रामविकासमंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाहीही दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील जागांबाबत मंत्री महाजन यांनी सर्वच्या सर्व सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. आता घोडामैदान समोर आहे. जळगाव लोकसभेच्या जागेबाबतच्या चर्चा निराधार आहेत. त्यामुळे आपण चार जूनला भेटू. जिल्ह्यातील लोकसभेच्या जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्क्य मिळेल आणि महायुतीच्या सर्वांत जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून येतील, असा दावाही मंत्री महाजन यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांच्याविषयीच्या दाव्यावर मंत्री महाजन यांनी राऊत यांचे डोके आता तपासावे लागणार असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीचा चार जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे म्हणत महाजन यांनी राऊत यांना डिवचले. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. भाजपला देशात स्पष्ट बहुमत मिळणार, मोठ्या मताधिक्क्यांनी भाजपचे उमेदवार निवडून येतील. देशवासियांच्या मनातच मोदींना पंतप्रधान करायचे आहे. त्यानुसार तेच पंतप्रधान होतील, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : नाशिकमधील ज्वेलर्सकडे सापडलं २६ कोटींचं घबाड; नोटांचा खच, ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता

रामदेववाडी अपघातातील संशयितांवर कारवाई

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावानजीक मोटार व दुचाकी अपघातातील संशयितांना राजकीय दबावातून पाठीशी घालण्यात येत असल्याच्या मुद्यावर मंत्री महाजन यांनी भाष्य केले. ज्या दिवशी अपघात झाला, त्या दिवशी मी रात्रभर जिल्हा रुग्णालयात होतो. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आमदार हे रुग्णालयात होते. सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हेसुद्धा होते. त्यामुळे मंत्र्यांनी दखल घेतली नाही, असा विषय नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणाबाबत चर्चा केली आहे. अपघातातील मृत कुटुंबियांच्या वारसांना येत्या दोन दिवसांत प्रत्येकी पाच लाखांचा धनादेश दिला जाणार आहे. या प्रकरणात राजकीय दबाव नसून, यात जो कोणी दोषी असेल, त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केलीच जाणार आहे. संशयितांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी बाहेरगावी पाठवले असतील, तर त्याबाबतचा अहवाल येण्यास थोडा वेळ लागत असेल, असेही मंत्री महाजन यांनी म्हटले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti win on all 6 lok sabha seats of north maharashtra says bjp leader girish mahajan css