नाशिक – दिंडोरी तालुक्यातील जऊळके वणी शिवारात लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेले मालवाहू वाहन उलटल्याने आठ ते १० जण जखमी झाले. यात अधिक्याने महिला आहेत. सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बाजूच्या कडा न भरल्याने एकाचवेळी दोन वाहने मार्गस्थ होताना अडचणी येतात. समोरील वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगितले जाते.
दिंडोरी तालुक्यातील अक्राळे गावातून लग्नासाठी सुमारे २५ जणांचे वऱ्हाड शुक्रवारी दुपारी मालवाहू वाहनाने जऊळके वणी येथे निघाले होते. कादवा साखर कारखाना रस्त्याने जात असताना समोरून आलेल्या वाहनास जागा देताना चालकास रस्त्याच्या कडांचा अंदाज न आल्याने मालवाहू वाहन उलटले. या अपघातात गायत्री लिलके (२१), सुनीता कोरडे (३२), सविता आचारी (३५), सुनीता बेंडकुळे (३२), अलका दाभाडे (३५), माधव आचारी (५५) यांच्यासह आठ ते १० जण जखमी झाले. संबंधितांना पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
अलीकडेच हा काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु, उंच झालेल्या रस्त्याच्या कडा योग्य प्रकारे भरल्या गेलेल्या नाहीत. परिसरातील अन्य सिमेंटच्या रस्त्यावर यापेक्षा वेगळी स्थिती नाही. परिणामी हे रस्ते अपघातांना नियंत्रण देणारे ठरत असून वारंवार अपघात होत असल्याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले. रस्त्याच्या कडा न भरल्याने एकाच वेळी दोन वाहने समोरासमोर आल्यास अपघात होण्याचा धोका असतो. साखर कारखाना सुरू झाल्यानंतर ऊस वाहतूक सुरू होईल. त्यामुळे विद्यार्थी, पादचारी व स्थानिक वाहनधारकांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.