नाशिक – चवदार खाद्यपदार्थ घेताना जातीचा विचार कोणी करीत नाही. हृदय शस्त्रक्रिया करताना उत्तम डॉक्टर हवा असल्याने तेव्हा जातीचा विचार नसतो. असे असताना निवडणूक काळात जातीचा विचार का केला जातो, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बागलाण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्या प्रचारार्थ रविवारी गडकरी यांची सटाणा येथे जाहीर सभा झाली. गडकरी यांनी, काँग्रेस मतांसाठी अल्पसंख्यांक समाजात भाजपविषयी भीती पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या ६८ योजना आहेत. यामध्ये उज्वला, आयुष्यमान भारत, लाडकी बहीण योजना आदींचा समावेश आहे. कोट्यवधी महिलांना या योजनांचा लाभ मिळत आहे. यातील एखाद्या योजनेखाली दलित, मुस्लिमांना अर्ज करता येणार नाही, असे लिहिले आहे का, असा प्रश्न करुन सर्वांना त्यांचा लाभ मिळत असल्याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. माणूस जातीने मोठा नसतो. गुणांनी मोठा असतो. समाजातील अस्पृश्यता, जातीयवाद, समूळ नष्ट करून मानवतेच्या आधारावर सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. आपल्याला जात, पंथ, धर्म यापेक्षा वरचा विचार करणारा समाज निर्माण करायचा असल्याचे त्यांनी सूचित केले.

हेही वाचा >>>अभिनेता गोविंदा छातीत दुखू लागल्याने रोड शो अर्धवट सोडून मुंबईत परत

देशातील गावे बकाल होण्याचे खापर गडकरी यांनी काँग्रेसवर फोडले. काँग्रेसने ग्रामीण भागाला स्वातंत्र्य दिले नाही. शेतकरी कल्याणाच्या योजना राबविल्या नाहीत. परिणामी ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना गाव सोडून शहराकडे जावे लागले. चुकीच्या आर्थिक धोरणांनी देशाचा सत्यानाश झाला. तेव्हा गावात रस्ते तयार करणे, शुध्द पाणी पुरवठा, उत्तम आरोग्य व्यवस्था, कृषी प्रक्रिया उद्योग यावर पैसे खर्च झाले असते तर स्थानिक पातळीवर तरुणांच्या हाताला काम मिळाले असते. गाव सोडून ते शहरांकडे गेले नसते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलणार असा केलेला प्रचार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबासारखा प्रकार आहे. काँग्रेसने स्वार्थासाठी आणीबाणी लावून, अनेकदा संविधानातील कलमांची मोडतोड केली. देशा्च्या इतिहासात पहिल्यांदा खेड्यांना मजबूत रस्त्याने जोडण्याचे काम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत साडेसहा लाखपैकी साडेतीन लाख खेड्यांना जोडण्याचे काम झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जोपर्यंत १०० टक्के सिंचन होत नाही, तोपर्यंत आत्मनिर्भर भारत होऊ शकत नाही, असे गडकरी यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari question is why caste is considered in elections amy