लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: मणिपूर राज्यातील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी आदिवासी समन्वय समितीच्या नेतृत्वात विविध समविचार संघटनांतर्फे आक्रोश मोर्चा काढत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन करीत जाहीर सभाही घेण्यात आली.

आदिवासी समन्वय समितीच्या नेतृत्वात लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, सचिन धांडे आदी आक्रोश मोर्चाचे सारथी झाले होते. मोर्चात जिल्हाभरातील विविध भागातील सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक आदिवासी बांधवांसह समविचारी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. शहरातील जी. एस. मैदानापासून मोर्चास प्रारंभ झाला. शिस्तीने आदिवासी बांधव मोर्चात सहभागी होते. मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकमार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाप्रसंगी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मोर्चाला अडविण्यात आले. तेथे मोर्चेकरी आदिवासी बांधवांनी ठिय्या मांडला. रिक्षावरील ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून तेथे जाहीर सभा घेण्यात आली. सुमारे दोन-अडीच तास सभा सुरू होती.

हेही वाचा… मणिपूर हिंसाचार निषेधार्थ धुळ्यात निदर्शने

सभेत प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे यांच्यासह आदिवासी समन्वय समितीच्या पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकारवर टीका केली. मुकुंद सपकाळे म्हणाले की, अन्याय, अत्याचार आणि शोषणग्रस्तांची जात, धर्म किंवा कुठलाही पंथ असत नाही, अशा सार्‍यांनाच माणूस म्हणून मदत करण्याची त्यांना एक जीवन जगण्याची हमी मिळवून देण्यासाठी माणसातली माणुसकी जागृत करण्याची वेळ खर्‍या अर्थाने आली आहे. आदिवासी महिलांना विवस्त्र करीत त्यांच्यावर अत्याचार केला जातो. महिलांवर अत्याचार करणार्‍यांना फाशी द्यावी. यासंदर्भातील खटला जलद गती न्यायालयात चालवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा… जळगाव: भडगावात बालिका हत्येचे पडसाद, जमावाची पोलीस वाहनांवर दगडफेक; मूक मोर्चा

प्रतिभा शिंदे म्हणाल्या की, मणिपूरमध्ये काही महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. अतिशय घृणास्पद आणि निंदास्पद अशा घटना मणिपूर राज्यात घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराचे पडसाद राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले. त्यामुळे जगभरात देशाची बदनामी झाली आहे. भारतीय नागरिक म्हणून शरमेने मान खाली घालायला लावणारा हा प्रकार असल्याची भावना निर्माण झाली आहे. हिंसाचाराला कारणीभूत ठरणार्‍या आणि अत्याचारात सहभागी होणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करीत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

वाहतूक मार्गात बदलामुळे कोंडीचे प्रकार

मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता बंद करण्यात आला होता. महामार्गावरून आकाशवाणी चौकाकडून शहरात येणारी वाहने जैन पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावरून थेट महाराणा प्रतापसिंह पुतळ्यामार्गे भास्कर व्यापारी संकुल, जिल्हापेठ पोलीस ठाणेमार्गे अशी वळविण्यात आली होती. ठिकठिकाणच्या चौकांमध्ये शहर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, वाहतुकीचा भार वाढल्यामुळे काही भागांत कोंडी झाल्याचे दिसून आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest in jalgaon about manipur violence dvr