उरण : सोमवारी स्वातंत्र्य संग्रामातील चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या हुतात्म्यांना ९३ व्या स्मृतिदिन शासकीय मानवंदना देत अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या १९३० सालच्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांच्या चिरनेर येथील मूळ स्मारकांच्या परिसरात पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, हुतात्म्यांचे नातेवाईक आदीजण उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण तालुक्यात चिरनेर, दिघोडे, मोठीजुई, कोप्रोली, पाणदिवे आणि खोपटे व धाकटी जुई या गावात हुतात्म्यांची स्मारके आहेत. ब्रिटीश सत्तेविरोधात उरण, पनवेल तालुक्यातील जनतेने चिरनेरच्या भूमीत २५ सप्टेंबर १९३० साली शांततेच्या मार्गाने जंगल सत्याग्रह आंदोलन उभारले, यावेळी ब्रिटीश सरकारच्या जुलमी पोलीस यंत्रणेने आंदोलकांवर बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात धाकू बारक्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटा), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या आठ आंदोलनकर्त्यांना वीर मरण प्राप्त झाले. तसेच ३८ आंदोलनकर्ते जखमी झाले होते.

हेही वाचा : चोरट्याने रिक्षात प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या गेलेल्या या चिरनेर जंगल सत्याग्रहाला विशेष महत्व प्राप्त झाले. या गौरव व तेजस्वी लढ्याचे स्मरण युवा पिढीला व्हावे यासाठी दरवर्षी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. चिरनेर सारख्या ऐतिहासिक गावात नादुरुस्त रस्ते, दरवर्षी येणारा पूर, त्यामुळे होणारे नुकसान आदी समस्या आहेत. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या कारणासत्व यावर्षी साधेपणाने मानवंदना देण्यात आली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In navi mumbai tribute to martyrs of chirner forest satyagraha during freedom struggle uran css