द इंडियन एक्सप्रेसच्या सहयोगी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांचे “हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड” हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्यात जवाहरलाल नेहरूंपासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या अनेक पंतप्रधानांच्या कारकिर्दीचा आणि त्यांनी घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांच्या मागील पार्श्वभूमीचा आढावा घेण्यात आला आहे. मात्र या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वगळण्यात आला आहे. यासाठी लेखिका नीरजा चौधरी यांनी तीन प्रमुख कारणे सांगितली आहेत. तसेच जम्मू-काश्मीरचे नेते, माजी खासदार डॉ. करण सिंह यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेख करत असताना त्या म्हणाल्या, “भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ नेहरुंवर टीका करत असला तरी मोदींना दुसरे नेहरू व्हायचे आहे किंवा त्यांनाही मागे टाकायचे आहे.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या “हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड” या पुस्तकाबाबत द इंडियन एक्सप्रेसने त्यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी विविध पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुस्तकातून का वगळले? याचीही कारणे दिली. भारताच्या राजकीय पटलावर मोदी यांची राजकीय कारकिर्द अजूनही सुरू आहे. त्याशिवाय विद्यमान पंतप्रधानांबाबत त्यांच्या आसपासचे लोक मोकळेपणाने बोलत नाहीत, असा अनुभव चौधरी यांनी व्यक्त केला. आताही भूतकाळातील पंतप्रधानांबाबत त्यांना जी काही माहिती मिळाली, ती पदावर नसलेल्या लोकांनी दिली आहे.

हे वाचा >> ‘राम मंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम रद्द, सत्तेसाठी या तीन गोष्टी महत्त्वाच्या’, राजीव गांधींना अरुण नेहरुंनी दिलेला सल्ला

नीरजा चौधरी पुढे म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतकाळातील पंतप्रधानांकडून बरीच धोरणे घेतली आहेत. जसे की, व्ही. पी. सिंह यांच्याकडून ओबीसींचे सबलीकरण, राव यांच्याकडून आर्थिक सुधारणा आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेसह धोरणात्मक संबंध प्रस्थापित करण्याची विकसित केलेली पद्धत मोदींनी घेतली. अनेक आर्थिक अडचणी, लोकांच्या वाढलेल्या आकांक्षा आणि जमिनीस्तरावर बदलत जाणारा भारत याचा अंदाज घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रभावाला मी अजूनही पूर्णपणे समजू शकलेले नाही. त्यामुळेच त्यांचा उल्लेख सध्यातरी पुस्तकात टाळण्यात आला आहे.”

कोणत्या पंतप्रधानाने सर्वाधिक प्रभावित केले?

नीरजा चौधरी यांनी अनेक पंतप्रधानांबाबत संशोधनात्मक लेखन या पुस्तकात केलेले आहे. त्यामुळे यांच्यापैकी कोणत्या पंतप्रधानाने त्यांना प्रभावित केले? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, “प्रत्येक पंतप्रधानांच्या काळात प्रभावित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांना कमजोर पंतप्रधान समजले जाते. पण अण्वस्त्र करार केल्यानंतर डाव्यांनी युपीएचा पाठिंबा काढून घेतला होता, पण डॉ. सिंग समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाले. त्यांचे हे कौशल्य इतरांना कळले नाही. नरसिंहराव आपल्या उजव्या हाताने काय करतात, हे त्यांच्या डाव्या हातालाही कळू द्यायचे नाही, इतका खासगीपणा जपत असत. व्ही.पी. सिंह यांनी गांधी परिवाराचे निष्ठावान म्हणून कामाला सुरुवात केली, मात्र तेच नंतर गांधी परिवाराचे सर्वात मोठे टीकाकार बनले. ज्यामुळे राजीव गांधी सरकारला उतरती कळा लागली.”

युवकांच्या ओठावर आजही इंदिरा गांधींचेच नाव

आतापर्यंत प्रभावित केलेल्या पंतप्रधानांबाबत बोलत असताना नीरजा चौधरी यांनी त्यांच्या गावातील एक उदाहरण दिले. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील माझ्या गावात मी काही दिवसांपूर्वी गेले होते. तेथील १७ ते १८ वर्ष वयोगटातील काही तरुणींशी संवाद साधत असताना मी त्यांना कोणता पंतप्रधान आतापर्यंत सर्वाधिक आवडला, असा प्रश्न विचारला. त्यावर त्या सर्वजणींनी एकमुखाने इंदिरा गांधी यांचे नाव घेतले. याचा अर्थ ४० वर्षांनंतरही इंदिरा गांधी तरुणांना प्रभावित करत आहेत. मलाही त्यांनी प्रभावित केलेले आहे, अशी स्पष्टोक्ती नीरजा चौधरी यांनी दिली.

राहुल गांधी यांच्यामुळे सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या नाहीत

२००४ साली यूपीएची सत्ता आल्यानंतर सोनिया गांधी पंतप्रधानपदावर आरूढ होण्यासाठी तयार होत्या. मात्र राहुल गांधी यांनी यासाठी विरोध केल्यामुळे त्या पंतप्रधान होऊ शकल्या नाहीत, असा दावा नीरजा चौधरी यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. यावर अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, “सोनिया गांधी पंतप्रधान बनण्यासाठी इच्छूक होत्या, मात्र राहुल गांधी यांच्या भूमिकेनंतर त्यांनी माघार घेतली. काँग्रेसच्या संसदीय मंडळानेही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र नंतर अशा काही घडामोडी घडल्या की त्यांनी पंतप्रधान न होता, दशकभर काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. आजही त्या काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्या म्हणून कायम आहेत. त्यांनी पंतप्रधानपद सोडले नसते तर त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले गेले असते.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp rss criticise nehru but pm narendra modi would like to be another nehru says neerja chowdhury in his book kvg