संतोष प्रधान
तीन राज्यांमधील भाजपच्या विजयाचे राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निश्चितच परिणाम होऊ शकतात. भाजपच्या विजयाची घौडदौड कायम असल्याचा संदेश या निकालातून गेला असून, राज्यातील मतदारांवर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातील राजकीय चित्र २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून बदलले आहे. मोदी लाटेत राज्यातही भाजपचे कमळ फुलले. तेव्हा लोकसभा निवडणुकीत भाजप- शिवसेनेने एकतर्फी यश मिळविले होते. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढताना भाजपचे १२२ आमदार निवडून आले होते. २०१७च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई, ठाणे वगळता राज्यात सर्वत्र भाजपलाच यश मिळाले होते. २०१९ मध्येही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेना युतीलाच यश मिळाले होते. एकूणच काँग्रेस-राष्ट्रवादीची सद्दी संपून राज्यात भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

हेही वाचा… तेलंगणात विजय काँग्रेसचा, पण चर्चा मात्र ‘एमआयएम’ची, अकबरुद्दीन ओवैसी तब्बल ८१ हजार मतांनी विजयी!

आगामी लोकसभा निवडणुकीत २०१४ आणि २०१९ च्या धर्तीवर ४० पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याकरिता भाजपने कंबर कसली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाजपचे नेते यशाबाबत आशावादी आहेत. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीबरोबर भाजपला एकटे लढणे कठीण गेले असते. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर चित्र बदलले आहे.

हेही वाचा… काँग्रेस तीन राज्यांत पिछाडीवर, लोकसभा निवडणुकीचे गणित बदलणार? ‘आप’ नेत्याच्या विधानामुळे चर्चेला उधाण!

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील भाजपच्या घवघवीत यशाने राज्यात भाजपला वातावरण अधिकच अनुकूल झाले आहे. कारण भाजप विरोधकांवर सहजच मात करू शकतो हे चित्र निर्माण झाले. पक्षाच्या पारंपारिक मतांमध्ये फरक पडत नाही. पण कुंपणावरील मते आपल्याकडे वळविण्याची भाजपला संधी मिळते. राज्यात विरोधकही दुबळे झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला अजूनही घसरण थांबविता आलेली नाही. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार एकहाती लढा देत असले तरी मतदार किती साथ देतील याचा कोणालाच अंदाज येत नाही. भाजपची हवा निर्माण झाल्याने निवडणुकीत तो घटक भाजप वा महायुतीला फायदेशीर ठरू शकतो. मोदी हे नाणे खणखणीत वाजल्यास महायुतीला आज तरी तेवढे आव्हान दिसत नाही.

हेही वाचा… चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात भवितव्य काय? राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला खीळ

लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा मोदी सत्तेत आल्यास त्याचा राज्यातील विधानसभा निवडणुकीवर निश्चितच परिणाम होऊ शकतो. कारण लोकसभेनंतर सहा महिन्यांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील. लोकसभेच्या निकालाचा विधानसभेवर नक्कीच परिणाम होतो. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विरोधातील काँग्रेैस, राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि शिवसेनेतील ठाकरे गटातील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास आश्चर्य वाटणार नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp won madhya pradesh rajasthan and chhattisgarh assembly election what will be the effect of this victory on maharashtra politics print politics news asj