राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे वाद आता हळूहळू प्रकर्षाने दिसू लागले आहेत. राजकारणात एखाद्या साध्या घडामोडीवरूनदेखील अनेक तर्कवितर्क लावले जातात. मात्र, महायुतीमध्ये तर आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एकमेकांवरची नाराजी उघडपणे दिसू लागली आहे. महायुतीच्या विजयात माझी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा होता. या योजनेवरून तसंच इतर अनेक मुद्द्यांवरून पवार आणि शिंदे यांच्यामध्ये ही धुसफूस पाहायला मिळत आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक वरिष्ठ नेते एकमेकांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना टाळत असल्याने महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीतील दरी आता अधिकच तीव्र होत चालली आहे. मागच्या आठवड्यात दोन्ही गटांच्या नेत्यांनी एकमेकांच्या कार्यक्रमांना अनुपस्थिती दाखवली, त्यामुळे महायुतीमधील या दोन मित्रपक्षांमध्ये शीतयुद्ध होत असल्याची चर्चा सुरू आहे.

कार्यक्रमांना गैरहजेरी

शनिवारी राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मानार्थ मुंबईत एका मोठ्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. फक्त एक दिवस आधी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचे मंत्री, पर्यटन मंत्री शुंभूराजे देसाई यांनी आयोजित केलेल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमात गैरहजर राहिले होते. शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरेगाव इथे गेले असल्याचं कारण यावेळी अधिकृतपणे सांगितलं गेलं. सातारा भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी त्यांची नावं निमंत्रण यादीत असतानाही पर्यटनाच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शविली. या निमंत्रणात साताऱ्याचे मकरंद पाटील, इंद्रनील नाईक यांची नावं होती.

दोन्ही पक्षांमध्ये सध्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरून तणाव सुरू आहे. शिवाय गेल्या आठवड्यात दोघांनीही एकमेकांच्या कार्यक्रमांना गैरहजेरी दर्शविल्याने सध्या ‘टिट फॉर टॅट’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रायगडमधील पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद, निधी मंजुरीला होणारा विलंब आणि अजित पवार यांच्या वित्त विभागाकडून कथितपणे अडवून ठेवल्या जाणाऱ्या फाईल्स, अशी अनेक कारणं या मतभेदामागे आहेत. १ मे रोजी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अदिती तटकरे यांनी राष्ट्रध्वज फडकवला होता, त्यामुळेही शिंदे गटात नाराजी पसरली.

रायगडचं पालकमंत्रिपद हा एक संवेदनशील मुद्दा आहे. या जिल्ह्यावर दोन्ही पक्षांचे नियंत्रण आहे. दरम्यान, माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाला विलंब झाल्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर उघडपणे टीका केली, त्यामुळे आता हा संघर्ष बंद दाराआड नक्कीच राहिलेला नाही हे स्पष्ट आहे.

भाजपाची मध्यस्थी नाही

महायुती आघाडीमधील सर्वात मोठा भागीदार असलेला मित्रपक्ष भाजपा या नाराजी नाट्यापासून दूर आणि शांत राहिला आहे. भाजपा नेत्यांकडून त्यांच्या मित्रपक्षांमधील वाढती अस्वस्थता कमी करण्यासाठी किंवा मध्यस्थी करण्यासाठी कोणतेही सक्रिय प्रयत्न होताना दिसत नाहीत. राजकीय विश्लेषकांना अशी खात्री आहे की, महायुती कागदावर संयुक्त आघाडी सादर करत असली तरी त्यांच्यातली अंतर्गत समीकरणं काही जुळताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी आणि शिवसेना गटांमधील समन्वयाचा अभाव आणि वाढता अविश्वास यामुळे येत्या काळात महायुतीपुढे अनेक आव्हाने निर्माण होऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका जवळ येत असताना ही परिस्थिती महायुतीतील कुठल्याच पक्षासाठी अनुकूल नाही.

येत्या रविवारी पर्यटन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती अपेक्षित आहे. शिवाय अजित पवार उपस्थित राहतात की नाही याकडेही सर्वांचं लक्ष आहे. पहिले दोन दिवस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या महोत्सवाकडे पाठ फिरवल्यानंतर येत्या काही दिवसांत ते हजेरी लावतील का याकडेही लक्ष लागले आहे. दोन्ही पक्ष वारंवार एकमेकांना बाजूला सारत असल्याने एक स्पष्ट संदेश नक्कीच जातो की, युती अधिकृतपणे असेलही, पण मैदानात मात्र दिवसेंदिवस वातावरण थंड होत चाललं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold war in mahayuti tensions rise as ajit pawar eknath shinde skip each others events hsp