छत्रपती संभाजीनगर : ‘काही जणांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. ते आता ‘ जनाब बाळासाहेब म्हणतात, अशी जाता जाता केलेली टीका वगळता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याऐवजी टीकेचा जोर एमआयएमवर केंद्रीत केला. ‘ ओवेसी ’ यांचे नाव घेऊन आणि ‘ व्होट जिहाद’ विरुद्ध मतांचे धर्मयुद्ध घडवा असे आवाहन करेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील प्रचाराच्या भाषणातील आक्रमकता वाढवली. औरंगाबाद पूर्व व औरंगाबाद मध्य या दोन विधानसभा मतदारसंघातील लढत शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाबरोबच नाहीच, असे राजकीय चित्र महायुतीच्या नेत्यांनी उभे करण्यास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील दहा मतदारसंघात मुस्लिम मतपेढीने केलेल्या एकगठ्ठा मतपेढीमुळे भाजपचा दहा लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्याचे सांगत ‘ व्होट जिहाद’ अशी संकल्पना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मांडली. संभाजीराजेंचा धर्मवीरपणा, औरंग्या असा शब्द प्रयोग करत मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग फडणवीस यांनी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. एमआयएम आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हातमिळवणी झाल्याचा आरोपही या वेळी औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी केला. पश्चिममध्ये मुस्लिम मते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे वळविल्यास औरंगाबाद पूर्वमधील दलित मते एमआयएमकडे म्हणजे इत्मियाज जलील यांच्याकडे वळविण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे आता हिंदूत्व राहिलेच नाही, असा प्रचारही सभेत करण्यात आला.

हेही वाचा : काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका

ओवेसीचे थेट नाव घेऊन या गावाचे नाव संभाजीनगरच राहील. कोणाचा बाप आला तरी ते बदलता येणार नाही, अशी आक्रमक भाषा वापरत औरंगाबाद शहरातील मतदारसंघात लढत ‘ एमआयएम’ बरोबरच असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीमध्येही शिवसेना ( एकनाथ शिंदे ) व एमआयएम अशीच लढत झाली होती तर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. तोच आधार पकडून शिवसेना उद्धव ठाकरे गट लढतीमध्ये नाही, असे चित्र राजकीय पटावर दाखवले जात आहे. असे चित्र निर्माण करणारी राजकीय घटनाही दिसून आल्या होत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या केवळ एक दिवस आधी किशनचंद तनवाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्यांची शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. तनवाणी यांनी पुढे शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ऐनवेळी बाळासाहेब थोरात या शिवसैनिकास उमेदवारी देण्यात आली. त्यानंतरही शिवसेना ( उद्धव ठाकरे ) पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील उमेदवार राजू शिंदे हे शहरा भोवती असणाऱ्या वस्त्यांमध्ये मतदार वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लढत एमआयएम बरोबर हे चित्र अधिक गडद व्हावे अशी प्रचाररचना असल्याचे चित्र भाजपकडून रंगवले जात आहे.

हेही वाचा :गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर

ओवेसी आपल्या भाषणात पूर्वी शिवसेनेवर आगपाखड करायचे. पण आता त्यांचा जोरही भाजप नेत्यांवर असतो. मराठवाड्यात मराठा नेते मनाेज जरांगे यांचेही ते कौतुक करत असल्याने भाजप समर्थकांना जरांगे आणि ओवेसी यांच्यामध्ये बंध असल्याचा प्रचार करण्याची संधी उपलब्ध होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दाेन मतदारसंघात लढत कोणाशी यावरुन प्रचार आखणी सुरू झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 chhatrapati sambhajinagar devendra fadnavis mim uddhav thackeray print politics news css