मुंबई : महाविकास आघाडीचे तुष्टीकरणाचे धोरण असून ते सत्तेवर आल्यास अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी व ओबीसींचे आरक्षण काढून घेतील, असे प्रतिपादन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना महायुती सरकारच्या शपथविधीचे सोहळ्याचे आमंत्रण द्यायला मी आलो आहे, असे गुरुवारी शिवाजीपार्क येथे महायुतीच्या झालेल्या प्रचारसभेत सांगितले. ‘ एक है, तो सेफ है ’, हा नारा पुन्हा देत महाराष्ट्रातील जनता हरियाणाप्रमाणेच महाविकास आघाडीला चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसच्या राजवटीत मुंबईसह देशात अतिरेकी हल्ले, रेल्वेगाड्या, बसगाड्या व अन्य सार्वजनिक ठिकाणी बाँबस्फोट होत होते. त्यावेळी मुंबईकरांवर भीतीचे सावट होते. पण महायुती सरकारच्या काळात अतिरेकी कारवायांना पायबंद बसला आहे. आमच्या सरकारच्या काळात जर अतिरेकी कारवाया करण्याचा प्रयत्न झाला, तर मोदी सरकार अतिरेक्यांना पाताळातूनही खणून काढेल, हे त्यांच्या म्होरक्यांना माहीत आहे. त्यामुळे मुंबईसह देशभरातील नागरिकांमध्ये आज सुरक्षिततेचे वातावरण असल्याचे मोदी यांनी सांगितले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख करुन त्यांच्याबद्दल प्रशंसोद्गार काढून दाखवावेत, त्यांना बाळासाहेबांचे आशिर्वाद मिळून शांत झोप लागेल, असे मोदी यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> लक्षवेधी लढत : जातीयवादाकडे झुकणारी लढत

मविआकडून तुष्टीकरण

मोदी म्हणाले, मविआ तुष्टीकरणाचे गुलाम असून जनतेचा अपमान करीत आहेत. मतांसाठी भगवा आतंकवाद असा शब्दप्रयोग त्यांनी केला. अयोध्येत भव्य राममंदिराच्या उभारणीला विरोध केला, जम्मू व काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू करण्यास त्यांनी विरोध केला. राजकारणात मुद्द्यांना विरोध समजू शकतो. पण प्रत्येक राजकीय पक्षाने देशहिताचा मुद्दा असेल, तेव्हा त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे.

काँग्रेसच्या खोट्या प्रचारात अडकू नका

पनवेल : काँग्रेसच्या खोट्या प्रचारात अडकलात तर ते समाजात भांडण लावून समाजाला वेगळे करण्याचे काम करतील आणि यातूनच ते सत्तेवर येण्याची संधी शोधतील. तसेच राहुल गांधी सांगतात की, त्यांची सत्ता आल्यावर आरक्षण संपवणार. त्यामुळे काँग्रेसच्या खोट्या प्रचारात अडकू नका, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी खारघर येथील सभेत व्यक्त केले.

कोकण विभागातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर येथील सेंट्रल पार्कजवळील मैदानात जाहीर सभा घेतली. भाजप आणि महायुती आहे तर राज्याचे प्रगती असे सांगत रायगड जिल्ह्याचा विकास होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, असेही मोदी म्हणाले. दि.बा पाटील यांचे योगदान, त्याग, बलिदान आपल्याला विसरता येणार नसून त्यांच्यामुळे आपल्याला राज्य पुढे नेण्याची नवीन ऊर्जा मिळते, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत अनेक प्रकल्प

मुंबई शहराचा चेहरामोहरा महायुती सरकारने बदलला असून रेल्वे, मेट्रो, अटल सेतू आणि अनेक पायाभूत सुविधांची लाखो कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. महाविकास आघाडी सरकारने जनहिताच्या प्रकल्पांमध्येही अडथळे आणले. महायुती सरकार विकासाचे राजकारण करीत असून मुंबईसह राज्याचा विकास साधायचा असेल, तर महायुतीला पुन्हा निवडून देवून मला जनतेची सेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन मोदी यांनी मुंबईकरांना केले. निकालानंतर आठ-दहा दिवसांमध्ये सरकार स्थापन होईल आणि या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण द्यायलाच मी आलो असल्याचे मोदी यांनी सांगितले.

मतांचे धर्मयुद्ध करण्याची आता वेळ फडणवीस

महायुती सरकारने केलेल्या कामांच्या आधारे आम्ही जनतेकडे मत मागत आहोत. पण विरोधक लांगूलचालनातून मते मागत आहेत. राज्यात २०१२-२४ या काळात झालेल्या दंगलींमधील मुस्लिम आरोपींना सोडून देण्याची उलेमांची मागणी आहे. या मागणीसह आघाडीने त्यांच्या १७ मागण्या मान्य केल्या आहेत. ते जर ‘ व्होट जिहाद ’ करणार असतील, तर आपल्याला ‘ मतांचे धर्मयुद्ध ’ करण्याची वेळ आता आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 pm modi addresses a public meeting in mumbai print politics news zws