मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी होणार हे नक्की झाले असून त्यांच्याकडे महसूल व नगरविकास ही खाती सोपविली जातील, अशी चिन्हे आहेत. महायुती सरकारचा जंगी शपथविधी करण्याची योजना असली तरी खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावरून घटक पक्षांमध्ये सहमती न झाल्याने उद्या, गुरुवारी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अशा तिघाचांच शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्याने आझाद मैदानात जंगी शपथविधी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसह २० ते २२ मंत्र्यांचा पहिल्य टप्प्यात शपथविधी करण्याची योजना होती. पण महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये खाते वाटप आणि मंत्र्यांची संख्या यावरून एकमत होऊ शकले नाही. परिणामी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी पार पडेल, अशी चिन्हे आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दिल्लीची मंजुरी मिळाल्यास कदाचित जास्त मंत्र्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गृह खात्यासाठी शिंदे यांचा आग्रह कायम होता. पण गृह खाते हे शिंदे यांना देण्यास भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला. सायंकाळी फडणवीस आणि शिंदे यांच्यात पुन्हा बैठक झाली. तेव्हा शिंदे यांना नगरविकाससह महसूल हे महत्त्वाचे खाते देण्याची तयारी दर्शविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. शिंदे हे उद्या शपथ घेतील, असे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> Maharashtra New CM: दहा वर्षांत देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी, काय घडलं गेल्या दशकभरात?

मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी ११ किंवा १२ डिसेंबरला करण्याचे ठरविण्यात आले आहे. मंत्रीपदासाठी कोणाला संधी द्यायची, खातेवाटप आणि मंत्रीपदांच्या वाटपाचा पेच यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपूर्ण मंत्रिमंडळाचा जंगी शपथविधी करण्याचे नियोजन तूर्तास फिसकटले आहे. मात्र महायुतीतील पेच सोडविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत फडणवीस आणि शिंदे यांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु होत्या आणि फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. केवळ तिघांचा शपथविधी न करता आणखी प्रत्येकी दोन किंवा तीन म्हणजे एकूण नऊ किंवा बारा मंत्र्यांचा शपथविधी करण्याच्या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु होती. याबाबतचा निर्णय गुरुवारी सकाळी होणार आहे.

भाजपच्या आग्रहामुळे शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय रात्री उशिरा घेतला. फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव सुचविलेले ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे किंवा नाही, यावरही सहमती झालेली नव्हती. फडणवीस हे शिंदे व पवार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करीत तर शिंदे यांच्या निवासस्थानी उदय सामंत, दीपक केसरकर, संजय शिरसाट आदी नेते उपस्थित होते. या नेत्यांसह अब्दुल सत्तार, संजय राठोड, दादा भुसे, शंभूराजे देसाई आदींशीही शिंदे यांनी मंत्रिमंडळातील समावेशाबाबत चर्चा केली आहे. भाजपने आक्षेप घेतला असला तरी शिंदे हे राठोड, सत्तार, केसरकर, तानाजी सावंत यांचा समावेश करावा, यामुद्द्यावर फडणवीस यांच्याशी पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीनही पक्षांमध्ये मंत्रीपदासाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे कोणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचे व कोणाला वगळायचे, असा पेच फडणवीस व शिंदे यांच्यापुढे आहे.

..तर हिरमोड ?

भाजपने शपथविधी सोहळ्यासाठी जंगी तयारी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह २२ राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, देशभरातील प्रमुख नेते, ३०० हून अधिक संत,महंत, विविध धर्मांचे धर्मगुरु, सर्व समाजघटकांचे प्रतिनिधी आदींना आझाद मैदानावर आमंत्रित केले आहे. मोठी तयारी केल्यावर केवळ तिघांचा किंवा दहा-बारा मंत्र्यांचा शपथविधी झाला, तर मंत्रीपदाची आशा बाळगून असलेल्यांचा मात्र हिरमोड होण्याची शक्यता आहे. आता मोजक्याच मंत्र्यांचा शपथविधी झाला, तर दोन-चार आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार करावा लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government formation eknath shinde will be part of government led by devendra fadnavis print politics news zws