राजेश्वर ठाकरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव जामोद (बुलढाणा) : स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेने देशात इतिहास घडवला, त्याविषयी आम्ही जाणून होतो. स्वातंत्र्योत्तर काळात अशाच प्रकारच्या यात्रेत आपलाही सहभाग असावा, अशी इच्छा होती. भारत-जोडो यात्रेने ही संधी मिळाली. यात्रेमुळे विविध भागातील लोकांशी भेटता आले, त्यांच्या समस्या कळल्या. लोकांना यात्रेकडून खूप अपेक्षा आहेत. व्यवस्था बदलाचे माध्यम म्हणून ते याकडे बघतात, असे यात्रेत पहिल्या दिवसापासून सहभागी नागपूरच्या पिंकी सिंग यांनी यात्रेतील अनुभव कथन करताना सांगितले.भारत जोडो यात्रेत सुरुवातीपासून ११७ यात्रेकरू सहभागी झाले असून त्यापैकी नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या पिंकी राजकुमार सिंग या एक आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ ते जळगाव जामोद दरम्यान पदयात्रेत त्यांची भेट झाली. कन्याकुमारी ते महाराष्ट्र या प्रवासातील अनुभव त्यांनी सांगितले.

पिंकी सिंग म्हणाल्या, यात्रेत विविध राज्यातून पदयात्रा करताना अनेक लोकं भेटले. भारताची संस्कृती यातून दर्शन झाले. वेगवेगळ्या राज्यातील भाषा, खानपान आणि भेटणारे लोकही वेगळे आहेत. पण, त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद, आपुलकी, जिव्हाळा मात्र सारखा आहे. त्यामुळेच कोणी गळाभेट घेतात, कोणी हस्तांदोलन करतात तर कोणी सेल्फी काढतात. प्रत्येकच राज्यातील लोकांना बेरोजगारी, महागाई यापासून मुक्ती हवी आहे. राहुल गांधी आमच्यासाठी काही तरी करतील असा त्यांना विश्वास वाटतो. विद्यमान व्यवस्था बदलण्याचे माध्यम म्हणून ते यात्रेकडे बघतात, असे लोकांशी बोलल्यावर कळते.

हेही वाचा: नांदेड-लातूरचे विळ्या-भोपळ्याचे राजकीय नाते ‘भारत जोडो’ मध्येही कायम

कन्याकुमारीहून यात्रेला सुरुवात झाली त्यावेळी लोक राहुल गांधी यांना बघण्यासाठी येत होते. त्यांच्यासोबत चालणारे कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये होती. लोक भेटायला यायचे तेव्हा ‘आम्ही कोणीतरी महत्त्वपूर्ण व्यक्ती आहोत’ असे वाटत होते. ३५७० किलोमीटर चालणार आहोत. म्हणजे वेगळा इतिहास घडवला जाणार आहे, अशी भावना मनात निर्माण होत होती. सुरुवातीला ११७ यात्रेकरू रांगेत चालायचो.हे लक्षवेधी चित्र होते. गर्दी वाढल्याने वेगवेगळे चालावे लागते. हा वेगळाच आणि समृद्ध करणारा अनुभव आहे, असे सिंग म्हणाल्या.

यात्रेत सहभाग कसा झाला हे सांगताना पिकी सिंग म्हणाल्या, देशभरातील लोकांशी भेटून त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेण्याची इच्छा होती. दरम्यान, काँग्रेस भारत जोडो यात्रा काढणार असल्याचे समजले. त्यात सहभागी होण्यासाठी नेत्यांशी संपर्क साधून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. काँग्रेसने राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेसाठी ११७ जणांची निवड केली. त्यात माझ्यासह महाराष्ट्रातील नऊ जणांचा समावेश होता. नऊपैकी नागपूरचे चार जण आहेत. असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: प्रवीण दटके : निष्ठावंत कार्यकर्ता

लोकांच्या स्वागताने डोळ्यात अश्रू
भारत जोडो यात्रा ही दुसरी दांडी यात्रा आहे. कन्याकुमारी ते महाराष्ट्र असा यात्रेचा अनुभव समृद्ध करणारा आहे. यात्रेकरूंचा सन्मान होत आहे. देशासाठी तुम्ही लेकी चालत आहात असे म्हणत ज्येष्ठ नागरिक डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात. समवयस्क पाया पडतात. हे पाहून डोळे भरून येतात. आपण खरच इतके मोठे काम करीत आहोत काय? असा प्रश्न पडतो. अशाप्रकारचे अनुभव पाचही राज्यात आले, असे हरियाणाच्या श्रेया ग्रेवाल म्हणाल्या.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People expect system change from bharat jodo yatra pinki singh shreya grewal buldhana jalgaon rahul gandhi print politics news tmb 01