मुंबई : दाऊद टोळीशी संबंध असल्याच्या कारणावरून नवाब मलिक यांना विधानसभेत महायुतीच्या बाकांवर बसण्यास आक्षेप घेणाऱ्या भाजपने दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता यांच्याबरोबर पार्टी व नाचगाणी करणाऱ्या नाशिकमधील सुधाकर बडगुजर यांना स्थानिकांचा विरोध डावलून पक्षात प्रवेश दिल्याने गुन्हेगारांशी संबंध असलेल्यांना पक्षात सामावून घेण्यासाठी भाजपची अगतिकता का, असा सवाल केला जात आहे.
नाशिक भाजपमधील सर्व नेत्यांचा विरोध डावलून बडगुजर यांना सन्मानाने पक्षात प्रवेश देण्यात आला. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतल्याचे स्थानिक नेते उघडपणे बोलू लागले आहेत. भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी तर बडगुजर यांना आपला विरोध कायम असल्याचे जाहीर केले आहे. आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने बडगुजर यांना पक्षात प्रवेश देण्यात आला असण्याची शक्यता वर्तविली जाते. पण हेच बडगुजर शिवसेना ठाकरे गटात असताना भाजपच्या दृष्टीने गुन्हेगारांशी संबंधित होते. दाऊदचा सहकारी सलीम कुत्ता याच्याबरोबर एका पार्टीत नाचतानाची बडगुजर यांची ध्वनिचित्रफीत तेव्हा प्रसारित झाली होती. दाऊदच्या सहकाऱ्याबरोबर ठाकरे गटाचा नेता नाचगाणी करतो म्हणून भाजपने किती काहूर माजविले होते. विधानसभेत भाजपची मंडळी तुटून पडली होती.
‘मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासारख्याबरोबर कोणी पार्टी करीत असल्यास संवेदना मेल्या आहेत. याची विशेष चौकशी पथकाकडून ठराविक कालमर्यादेत चौकशी केली जाईल, अशी घोषणा तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. या चौकशीचे काय झाले हे कधीच पुढे आले नाही. पण दाऊदच्या सहकाऱ्याबरोबर आणि बॉम्बस्फोटातील आरोपी कुत्ता याच्याबरोबर पार्टी केली म्हणून दोन वर्षांपूर्वी भाजपची मंडळी तुटून पडली त्याच बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मुख्यमंत्री फडणवीस व अन्य भाजप नेत्यांनी कोणता संदेश दिला, असा सवाल केला जात आहे.
बडगुजर भाजपला एवढे प्रिय का?
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक हे महायुतीच्या बाकांवर बसल्याबद्दल फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र पाठवून दाऊदसारख्या गुन्हेगाराबरोबर संबंध असलेले मलिक महायुतीत नको, अशी भूमिका मांडली होती. पण त्याच वेळी दाऊदचा सहकारी व बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर नाचगाणी करणारे बडगुजर भाजपला एवढे प्रिय का, असा सवाल केला जात आहे. बुडगुजर यांच्या विरोधात थोडे थोडके नव्हे तर तब्बल २९ गुन्हे दाखल आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपने बडगुजर यांना आपल्या कळपात दाखल करून घेतले असले तरी त्यातून पक्षाच्या प्रतिमेला नक्कीच धक्का बसला आहे. अर्थात, भाजप नेत्यांना त्याचे काहीही देणेघेणे नसते. लोक दोन दिवसांच सारे विसरतात, अशी भाजपच्या नेत्यांचा युक्तिवाद असतो. गोपीनाथ मुंडे यांनी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला विरोध करीत पप्पू कलानी, भाई ठाकूर यांना जोरदार विरोध केला होता. पण देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उल्हासनगरमध्ये भाजपने पप्पू कलानीच्या मुलाशी हातमिळवणी केली होती.
राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांचा पाठिंबा भाजपने घेतला होता. आता बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर नाचगाणी करणाऱ्या बडगुजर यांना भाजपने बरोबर घेतले आहे. एकीकडे राजकारणाचे गुन्हेगारीकरणावर चिंता व्यक्त करायची आणि दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना बरोबर घ्यायचे अशी भाजपची दुटप्पी भूमिका राहिली आहे. विकासाच्या मुद्द्यांवर आम्ही राजकारण करतो, असे भाजपचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नेते दावा करीत असताना बडगुजरसारख्या बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध असणाऱ्या नेत्याला घेण्याची भाजपची एवढी अगतिकता का, असेच बोलले जात आहे.
© The Indian Express (P) Ltd