छत्रपती संभाजीनगर : कपाळी मोठ्ठं कुंकू. बोलण्यात नेहमीच बेधडकपणा. म्हणजे कोणी तरी नाराज होईल म्हणून शब्द गिळणाऱ्यापैकी सूर्यकांत पाटील नाहीत. तरीही त्यांनी १० वर्षे भाजपमध्ये तसे कोणावर फारशी टीका न करता काढले. शैलीदार वक्तृत्व असताना आणि राजकीय कथन बदलविण्याची क्षमता असणाऱ्या सूर्यकांता पाटील यांच्याकडे भाजपच्या नेत्यांनी तसे लक्ष दिलेच नाही. शेवटी वयाच्या ७५नंतर त्यांनी पुन्हा शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. कोणत्याही पदाच्या लालसेने नाही तर शरद पवार यांच्या बरोबर सामांन्य कार्यकर्ता म्हणून काम करू, असे त्यांनी जाहीर केले. चुकलेल्या मार्गावरील गाडी वळवून त्यांनी पुन्हा मूळ रस्त्याला आणली असल्याने अगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा उपयोग कसा करून घेतला जाईल, याची नांदेड व हिंगोली जिल्ह्यात उत्सुकता वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यकांता पाटील यांचे वडील जयवंतराव पाटील हे हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात हुतात्मा झालेले. इसलापूर पोलीस ठाण्यावर हल्ला करुन शस्त्रअस्त्र लुटू आणि निजामाविरुद्ध लढू असे मानणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये जयवंतराव होते. तो वारसा असणाऱ्या सूर्यकांता पाटील यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४८चा. राजकारण तसं घरातच होतं. त्यांचे आजोबा माधवराव पाटील यांनी शंकरराव चव्हाण यांचा १९९५१-५२ च्या निवडणुकीत पराभव केला होता. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक तानाबाना कळणाऱ्या सूर्यकांता पाटील या नांदेडमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या. पुढे १९७७ – ७८ मध्ये इंदिरा काँग्रेसच्या ‘निष्ठावान’ गटात त्या होत्या. या काळात दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी सूर्यकांता पाटील यांचे नेतृत्वगुण हेरले. १९८० मध्ये विधानसभेत त्या पहिल्या प्रयत्नातच हादगाव मतदारसंघात निवडून आल्या. पुढील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांच्याशी जुळवून घेतले. वक्तृत्व आणि विचार मांडण्याची ताकद असल्याने त्यांच्याकडे राष्ट्रवादीने केंद्रात ग्रामविकास राज्यमंत्री पदापर्यंतची जबाबदारी दिली. तोपर्यंत हिंगाेली लोकसभा मतदारसंघात त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले होते.

हेही वाचा >>>बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकमताने निवड; कोण आहेत ओम बिर्ला?

२००४ मध्ये त्या हिंगोली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. पुढील राजकीय घडामोडी फासे उलटे फिरले. त्यानंतर सूर्यकांता पाटील शरद पवार यांच्यावरही नाराज होत्या. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या सर्व विरोधकांना भाजपमध्ये घेण्याचा घाऊक कार्यक्रम सुरू होता. भास्करराव खतगावकर, माधवराव किन्हाळकर याच साखळीत सूर्यकांता पाटील यांचेही नाव भाजपच्या यादीत आले. पुढे दहा वर्षे भाजप राजकीय पटावर आपला विचार करेल असे समजून सूर्यकांता पाटील अधून- मधून नाराजी व्यक्त करत भाजपमध्ये थांबल्या. पण भाजप नेते दखलच घेत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता पक्ष बदलला आहे. नांदेड जिल्ह्यात शरद पवार यांना फारसे पाय पसरता आले नाहीत. सूर्यकांता पाटील यांच्या रुपाने राष्ट्रवादीमध्ये काही नवे घडेल का, हे सांगणे अवघड असले तरी एक मात्र नक्की की, त्यांची गाडी रुळावर आली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakanta patil on track after joining sharad pawar ncp group all eyes on her upcoming maharashtra assembly election performance print politics news amy