Sharmishta Panoli : पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या शर्मिष्ठा पानोली नावाच्या २२ वर्षीय विद्यार्थिनीला शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली. या विद्यार्थिनीवर ऑपरेशन सिंदूरवरील पोस्टला उत्तर देताना आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. शर्मिला हिच्या अटकेसंदर्भात कोलकाता पोलिसांच्या बचावात्मक भूमिकेमुळे आता राजकीय पक्षांनी यामध्ये उडी घेतली आहे. शर्मिष्ठा हिची अटक बेकायदा असल्याचे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी म्हटले आहे. कोलकाता पोलिसांनी शर्मिला हिला बेकायदा अटक केली असून, तिच्यावर कठोर कारवाई केली जात असल्याचा आरोप इतर वापरकर्त्यांनी केला आहे.

कोलकाता पोलिसांनी या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये बेकायदा अटक करण्यात आल्याचे कथन पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे, असे सांगण्यात आले आहे. “सर्व कायदेशीर प्रक्रियांचे योग्य पालन करण्यात आले. नोटीस बजावण्याचे सर्व प्रयत्न करण्यात आले; मात्र ती प्रत्येक वेळी फरारी असल्याचे आढळले. परिणामी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. त्यानंतर तिला गुरुग्राम इथून कायदेशीररीत्या अटक करण्यात आली. त्यानंतर तिला योग्य दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसार ट्रान्झिट रिमांड देण्यात आला”, असे त्यात म्हटले आहे.

शर्मिष्ठा पानोलीची पोस्ट काय?

पानोलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, जो आता डिलीट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये तिने बॉलीवूड कलाकारांवर ऑपरेशन सिंदूरवर मौन बाळगल्याचा आरोप करताना जातीयवादी टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. तिच्या व्हिडीओमुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला. अनेक वापरकर्त्यांनी तिच्यावर टीका केली, तसेच तिला धमकीचे संदेशही पाठवले. पानोलीच्या अटकेनंतर राजकीय नेत्यांनी तीव्र टीका केली.

राजकीय प्रतिक्रिया- तुष्टीकरणाच्या राजकारणावर टीका

पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी पानोलीच्या अटकेबद्दल तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. पक्ष त्यांच्या मतपेढीसाठी विशिष्ट समुदायाला आवाहन करीत असल्याचा त्यांनी आरोप केला. पत्रकारांशी बोलताना अधिकारी म्हणाले, “महुआ मोइत्रा यांच्याविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यांनी देवी कालीबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. काही कारवाई करण्यात आली का? टीएमसीच्या खासदार सायोनी घोष यांनी महादेवाबद्दल काय पोस्ट केली? काही कारवाई करण्यात आली का? फिरहाद हकीम यांच्याविरुद्ध इतक्या एफआयआर दाखल आहेत; पण कोणतीही कारवाई झालेली नाही.”
“ही कारवाई फक्त सनातन्यांच्या विरोधात केली जाते. इथे प्रत्येकाला सनातनचा गैरवापर करण्याचा परवाना आहे. हे तुष्टीकरणाचे राजकारण आहे. एका विशिष्ट समुदायाची मतपेढी आहे आणि हे तुष्टीकरणासाठीच आहे”, असेही अधिकारी पुढे म्हणाले.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनीही यावर वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे, “पानोली यांनी त्यांच्या शब्दांबद्दल माफी मागितली होती; पण तरीही त्यांना शिक्षा झाली. पण, तृणमूल काँग्रेसचे निवडून आलेले नेते, खासदार सनातन धर्माची थट्टा करतात तेव्हा लाखो लोकांना होणाऱ्या खोल, तीव्र वेदनांचं काय? आपल्या श्रद्धेला ‘गांध धर्म’ म्हटले जाते तेव्हाचा संताप कुठे आहे? त्यांची माफी कुठे आहे? त्यांची त्वरित अटक कुठे आहे? ईशनिंदेचा नेहमीच निषेध केला पाहिजे! धर्मनिरपेक्षता काहींसाठी ढाल आणि काहींसाठी तलवार नाही. धर्मनिरपेक्षता द्विमार्गी असली पाहिजे. देश पाहत आहे. सर्वांसाठी न्यायाने वागा”, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

भाजपा खासदार व अभिनेत्री कंगना रनौत यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पानोलीच्या बाजूने पोस्ट केली आहे. “शर्मिष्ठानं तिच्या अभिव्यक्तीसाठी काही अप्रिय शब्द वापरले हे मी मान्य करते; मात्र असे शब्द आजकाल बहुतेक तरुण वापरतात. तिने तिच्या विधानांबद्दल माफी मागितली आहे आणि ते पुरेसे असावे. तिला आणखी धमकावण्याची आणि त्रास देण्याची गरज नाही. तिला ताबडतोब सोडले पाहिजे”, असे कंगनाने म्हटले आहे.

पश्चिम बंगाल भाजपा अध्यक्ष व केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार म्हणाले, “ही अटक राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या शर्मिष्ठा पानोली हिला आता हटवलेल्या व्हिडीओ आणि सार्वजनिक माफीसाठी अटक करण्यात आली आहे. दंगल नाही. अशांतता नाही. तरीही ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी रात्रभर कारवाई केली, ती न्यायासाठी नाही; तर तुष्टीकरणासाठी होती. पण जेव्हा टीएमसी नेते सनातन धर्माचा अपमान करतात आणि ‘जय श्रीराम’ला शिवी असल्याचं म्हणतात, तसेच महाकुंभाची खिल्ली उडवतात आणि जातीय विष पसरवतात; तेव्हा एफआयआर नाही, अटक नाही आणि माफी नाही.”

या प्रकरणात आता डच खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनीही एक्सवर पोस्ट केली आहे. “शूर शर्मिष्ठा पानोली यांना मुक्त करा! तिला अटक करण्यात आली हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कलंक आहे. पाकिस्तान आणि मुहम्मदबद्दल सत्य बोलल्याबद्दल तिला शिक्षा करू नका. तिला मदत करा @narendramodi!”, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.