Pune Rain News Update: पुण्यामध्ये आज अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सिंहगड रोड परिसरामध्ये अनेक भागांत दोन ते तीन फूट पाणी साचलं असून नागरिकांना वाचण्यासाठी बचावपथकं दाखल झाली आहेत. दुसरीकडे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खडकवासला धरणातून पहाटेच्या सुमारास पाणी सोडल्यामुळे अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन वेळप्रसंगी एअरलिफ्टची गरज पडल्यास तेही करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं आहे. प्रशासनाच्या या निर्णयासंदर्भात चर्चा सुरू असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावर प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पुण्यात कालच रेड अलर्ट दिला होता”

पुणे व आसपासच्या भागात अतीमुसळधार पावसाचा रेड अलर्ट (Pune Rain Red Aert) बुधवारीच देण्यात आला होता, असं अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. “रेड अलर्ट कालच देण्यात आला होता. आज पुणे-पिंपरी-चिंचवडच्या शाळांना सुट्या देण्यात आल्या आहेत. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर ही धरणं कमी भरली होती. त्यामुळे पुण्याला निम्मा काळच पाणी पुरेल अशी स्थिती होती. पण आपल्याकडचं खडकवासला धरणं पावणे तीन टीएमसीचंच आहे. खडकवासलाच्या वरच्या भागात ८ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. पुण्यात जवळपास पाच इंच पाऊस झाला”, असं अजित पवार म्हणाले.

“खडकवासला धरणं तर लगेच भरतं. धरण पावणेतीन टीएमसी आणि वरून साडेतीन टीएमसी पाणी आल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडावे लागले. ४५ हजारांपेक्षा जास्तीचा विसर्ग धरणातून सोडला. आम्ही पहाटे पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री पाणी सोडलं असतं तर लोक झोपेत असतानाच त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलं असतं. त्याचा लोकांना त्रास झाला असता. आत्ता पाणी बंडगार्डनला पोहोचलं आहे. दौंडला पोहोचलेलं नाही. त्याला अजून काही तास लागतील. त्यानंतर ते पाणी उजनीमध्ये जाईल. दौंडला कमी क्युसेक्सनंच पाणी जातंय”, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.

“पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांनाही अलर्ट केलं आहे. पवना ७० टक्के भरलंय.पण वरच्या भागात १५ इंच पाऊस झालाय. त्यामुळे ते पाणी आलं तर तिथलं पाणी सोडावं लागेल. पुण्यातून पाणी जात असताना मुळशीचं ओव्हरफ्लोचं पाणी तिथे येऊ शकतं. वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचं पाणीही येऊ शकतं. मावळ तालुक्यातल्या धरणांमधलंही पाणी येऊ शकतं”, अशा शब्दांत अजित पवारांनी नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना केली आहे.

पुणे शहरात पावसाचा हाहाकार; पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद

“काही ठिकाणी पाऊस सलग चालू राहिला दरडी कोसळतात. त्यामुळे लोकांनी फार गरजेचं असेल तरच बाहेर पडावं. नाहीतर सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्यांनी आपापल्या ठिकाणीच राहणं आवश्यक आहे”, असंही अजित पवार म्हणाले.

बचावकार्यासाठी प्रशासन सज्ज

पुण्यात निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीमध्ये एनडीआरएफची बचावपथकं काम करत आहेत. त्याचवेळी राज्याच्या इतर भागातही एनडीआरएफ, एसडीआरएफची पथकं सज्ज असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. “आत्ता मुंबईत कुर्ला-घाटकोपरला एनडीआरएफच्या दोन, ठाण्यात एक, रायगड एक, पालघर एक, रत्नागिरी २, कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक, मुंबईत स्टँडअलोन तीन पथकं, पुण्यात ३ व नागपूरला १ अशी १८ एनडीआरएफची पथकं तयार आहेत. एसडीआरएफची सहा पथकंही सज्ज आहेत”, असं ते म्हणाले.

“दुर्दैवाने पहाटे ३ च्या सुमारास नदीला पाणी सोडण्याच्या वेळी नदीपात्रात अनधिकृतपणे अंडाभुर्जी वगैरेच्या हातगाड्या उभ्या होत्या. पहाटे तिथे तीन जणांचा मृत्यू झाला. तिथे त्यांना विजेचा शॉक बसला. पाऊस सुरू झाल्यानंतर नदीकाठचे बहुतेक लाईट कनेक्शन बंद केले होते. पण स्ट्रीटलाईट चालू होते. कदाचित अनधिकृतपणे तिथून वीज घेतल्यामुळे त्याचा शॉक बसला असण्याची शक्यता आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. “ताम्हिणी घाटात दरड कोसळली आहे. तिथे एकाचा मृत्यू झाला आहे. एक जखमी झाला आहे. लवासात एका बंगल्यावर दरड कोसळली. पण तिथे कुणी नव्हतं. तरी आम्ही तिथे एक बचावपथक पाठवलं आहे”, असंही अजित पवारांनी सांगितलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar on pune rain update with heavy rainfall khadakwasla dam water level pmw