भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडून त्यांचा अपमान केलाय, असं वक्तव्य बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना आंबेडकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचा संदर्भ देत नवीन सरकारमधील भाजपाच्या भूमिकेवर टीका केली.

नक्की वाचा >> “महाविकास आघाडीने स्वत:चे सगळे आमदार घेऊन राष्ट्रपतींसमोर ठिय्या बसावयचा आणि…”; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“देवेंद्र फडणवीसांना केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केलं, यामधून तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे?”, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना पुण्यामधील पत्रकार परिषदेत त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरुन विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार झालं तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळी शंकरराव चव्हाण अर्थमंत्री होते. त्याआधी शकंरराव चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. ते काँग्रेसशी एकनिष्ठ होते. इंदिरा गांधींच्या सांगण्यावर ते काँग्रेसच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी दिल्लीवरुन आलेला आदेश मान्य केलं. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीचा आदेश मान्य केला,” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. पण त्यांच्या अध्यक्षांनी आणि केंद्रीय नृत्वाने त्यांना आदेश दिला की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. त्याप्रमाणे त्यांनी शपथ घेतली म्हणून मी म्हणालो की भाजपामुळे फडणवीसांचा शंकरराव चव्हाण झाले,” असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलं.

नक्की वाचा >> “BJP आणि RSS ला विचारलं पाहिजे, फडणवीसांचा अपमान करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलंय का?”

“तुम्ही भाजपाच्या आणि संघाच्या केंद्रीय नेत्यांना विचारलं पाहिजे की, तुम्ही फडणवीसांचा अपमान करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पदं दिलं आहे का?, नियंत्रण ठेवायचं होतं तर चंद्रकांत पाटील पण होते,” असं प्रकाश आंबेडकरांनी विचारलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री करता आलं असतं असं म्हटलंय. तसेच चंद्रकांत पाटील हे मागील सरकारच्या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे काम करत होते. त्याप्रमाणे ते केंद्रीय गृहमंत्री आणि माजी भाजापाध्यक्ष अमित शाह यांच्या जवळचे असल्याचं सांगत आंबेडकर यांनी असं असतानाही फडणवीसांना का उपमुख्यमंत्री करण्यात आलं अशा अर्थाचं ट्विट केलं आहे.

नक्की वाचा >> “…मग तेव्हा युती का तोडली?”; शिंदेंना मुख्यमंत्री करुन स्वत: उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना शिवसेनेचा थेट सवाल

“चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले.एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवरुन विचारला आहे. तसेच त्यांनी आमची सहानुभूती देवेंद्र फडणवीसांसोबत आहे अशा अर्थाचा हॅशटॅगही वापरला आहे.

राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या अंतिम टप्प्यात भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गुरुवारी सायंकाळी राजभवनात पार पडला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपाचा उद्देश स्पष्ट झाला असला तरी फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आल्याने पक्षनेते बुचकळ्यात पडल्याचं चित्र दिसत असून विरोधी पक्षांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp made devendra fadnavis deputy cm to insult him says prakash ambedkar svk 88 scsg
First published on: 01-07-2022 at 13:30 IST