पुणे : प्रत्येकाच्या जीवनात आनंदाची पर्वणी घेऊन येणाऱ्या झगमगत्या प्रकाशाचा सण असलेल्या दीपोत्सवाची शुक्रवारपासून (१७ ऑक्टोबर) नांदी होत आहे. यावर्षी दिवाळीचे चार दिवस वेगवेगळे आले असून २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या वर्षी २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, २१ ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन , २२ ऑक्टोबर रोजी दिवाळी पाडवा आणि २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज या प्रमाणे दिवाळी आहे.

नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रदोषकाळात अमावास्या असून दुसरे दिवशी २१ ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून सायंकाळपर्यंत अमावास्या असलेल्या दिवशी धर्मसिंधु, पुरुषार्थ चिंतामणि, तिथिनिर्णय या ग्रंथांमधील वचनांचा विचार करून मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन धर्मशास्त्रसंमत असून यादिवशी सूर्यास्तापूर्वी अमावास्या संपत असली तरीही मंगळवारी नेहमीप्रमाणे सायंकाळी व प्रदोषकाळात (सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे या कालावधीत) लक्ष्मीपूजन करावे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.

दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते. वर्षभरातील इतर सण – उत्सव यांचे प्रमाणे दिवाळीचे स्वरूप नसते. सर्व समाजाने दुःख, भेदभाव विसरून चार दिवस आनंदात रहावयाचे असते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्याची पद्धति जवळजवळ सारखीच आहे. मुख्यत: घर, दुकान स्वच्छ करून, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ, गोडधोड पक्वान्न करणे, अभ्यंगस्नान, दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांनी एकत्र येणे इ. गोष्टी केल्या जातात पतीने पत्नीसाठी, भावाने बहिणीसाठी, मालकांनी कर्मचाऱ्यांसाठी भेटवस्तू देणे आणि स्नेहभाव दृढ करणे यामुळे संपूर्ण समाजात – कुटुंबात एकोपा राखला जातो. प्रत्येक धर्मीयांच्या सण – उत्सवामुळे संपूर्ण भारतात खरेदी – विक्री होऊन आर्थिक उलाढाल वाढते अर्थातच त्यामुळे आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होऊन भारताची प्रगति होण्यात या सण – उत्सवांचे मोठे सहकार्य लाभते ही गोष्ट निश्चितच लक्षात ठेवली पाहिजे, असे मोहन दाते यांनी सांगितले.

महाराष्ट्रात दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, महाराष्ट्रीय पंचांग नागपूर, निर्णयसागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग तसेच भारतातील शंभराहून अधिक पंचांगात २१ ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. आपण गेली अनेक वर्षे जे पंचांग किंवा दिनदर्शिका वापरत आहात, त्यामध्ये दिल्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये. मोहन दाते (दाते पंचांगकर्ते)

दिवाळीतील दिवसांची माहिती

वसुबारस (शुक्रवार १७ ऑक्टोबर)

या दिवशी सुवासिनी एकभुक्त राहून (एकवेळ जेवण करून) सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गाईचे सूर्यास्तानंतर पूजन करतात. आता शहरात अनेक ठिकाणी पूजनासाठी गाई उपलब्ध नसतात. अशावेळेस गाय वासराच्या मूर्तीची देखील पूजा करता येते. ते ही शक्य नसल्यास गाईच्या चित्राची पूजा करता येते. मात्र अशा वेळेस गाईच्या गोग्रासाकरिता म्हणून आपल्या भागातील गोशाळेस शक्य ते सहकार्य करावे.

धनत्रयोदशी, यमदीपदान (शनिवार १८ ऑक्टोबर)

आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. यमराजाला प्रसन्न करण्याकरिता या दिवशी यमदीपदान केले जाते. घरातील अलंकार, सोने – नाणे स्वच्छ केले जाते. विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग, द्रव्यनिधी यांची पूजा केली जाते. अपमृत्यू म्हणजेच अकाली, अपघाताने मृत्यू येऊ नये यासाठी सायंकाळी कणकेचा दिवा दक्षिणेस ज्योत करून ठेवावा. घरातील प्रत्येकाने खालील श्लोक म्हणून दिव्यास नमस्कार करावा.
मृत्यूना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।

त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

नरक चतुर्दशी – (सोमवार २० ऑक्टोबर)

नरकासुराने १६ हजार १०८ स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून त्यांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे. शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. नरक चतुर्दशीचे दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन अशा अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यू निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे.

लक्ष्मीकुबेर पूजन – ( मंगळवार २१ ऑक्टोबर)

शेतकऱ्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धिसाठी प्रार्थना करावयाची असते.

नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये । या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात्त्वदर्चनात् ।। अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच । भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥ अशी कुबेराची प्रार्थना करावी. या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.

लक्ष्मीपूजन मुहूर्त ( मंगळवार २१ ऑक्टोबर)

दुपारी ३ ते ४. ३०, सायंकाळी ६ ते ८.३०, रात्री १०.३० ते १२

बलिप्रतिपदा – दिवाळी पाडवा – ( बुधवार २२ ऑक्टोबर)

कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरू होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण करावे. म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते.

वहीपूजन मुहूर्त (बुधवार २२ ऑक्टोबर)

पहाटे ३ ते ६, सकाळी ६.३० ते ९.३०, सकाळी ११ ते १२.३०

यमद्वितीया – भाऊबीज – (गुरुवार २३ ऑक्टोबर)

नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र, या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याचे औक्षण करावे, असे सांगितले आहे.