पुणे : पावसाच्या हलक्या सरी आणि भक्तिरसाने भारलेल्या वातावरणात सुमारे ३५ हजार महिलांनी ऋषिपंचमीनिमित्त दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण केले. अथर्वशीर्षाबरोबरच महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, न्यायाधीश किरण क्षीरसागर, प्रसेनजित फडणवीस, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने या वेळी उपस्थित होते.

पावसाच्या हलक्या सरींनी पहाटेपासूनच शहराच्या मध्यरात्री भागात हजेरी लावायला सुरुवात केली. अशा वातावरणातही हजारो महिला मोठ्या उत्साहात अथर्वशीर्ष पठण उपक्रमात सहभागी झाल्या. महिलांनी पारंपरिक वेशात मध्यरात्री दोन वाजल्यापासून दगडूशेठ गणपतीच्या उत्सव मंडपासमोर जमायला सुरुवात केली.

शंखनादाने सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महिलांनी अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरिता गर्दी केली. भक्तिरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.

अर्चना भालेराव आणि प्रा. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

‘संकटे दूर होऊ दे’

‘मोठ्या संख्येने महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. उत्साह, अन् मांगल्याच्या वातावरणात झालेल्या अथर्वशीर्ष पठणामध्ये सहभागी होता आले. हा अवर्णनीय अनुभव आहे,’ अशी भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.‘देशासमोर, राज्यासमोर जी काही संकटे येत आहेत, ती दूर होऊ दे. प्रत्येकाला सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी जीवन मिळू दे,’ अशी प्रार्थना त्यांनी केली.