देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांत फेब्रुवारी अखेरपर्यंत थंडी कायम राहिली. गहू उत्पादक राज्यांत अवकाळीसारख्या नैसर्गिक आपत्तींचा फारसा फटका बसला नाही. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी ११४० लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय अन्न महामंडळाकडून व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उत्तर भारताला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागला होता. यंदाही हवामान विभागाने उत्तर भारताला उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या झंझावातामुळे गहू उत्पादक पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये फेब्रुवारीअखेरपर्यंत थंडीचे वातावरण राहिले. अवकाळी आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान होण्याचे प्रमाणही कमी राहिले आहे. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन ११४० लाख टनांवर जाण्याचा अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी व्यक्त केला आहे. या अंदाजाला भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष अशोक के मीणा यांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा >>> समाविष्ट गावातील मिळकतकराबाबत अजित पवार यांची सूचना काय?

गहू उत्पादनाचा चढता आलेख

देशात २०२१-२२ मध्ये १०७७ लाख टन गहू उत्पादन झाले होते. २०२२-२३ मध्ये ३३५.६७ लाख हेक्टरवर गहू लागवड होऊन, सुमारे ११०० लाख टन गहू उत्पादन झाले होते. यंदा २०२३-२४ मध्ये ३३६.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर गहू लागवड होऊन ११४० लाख टन गहू उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश या प्रमुख गहू उत्पादक राज्यांत उत्पादनात चांगली वाढ होण्याचा अंदाज आहे.

केंद्र खरेदी करणार ३२० लाख टन गहू

केंद्र सरकार भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यमातून हमीभावाने ३०० ते ३२० लाख टन गहू खरेदी करणार आहे. त्यासाठी देशात २१० खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. ही खरेदी हमीभावाने म्हणजे २२७५ रुपये अधिक त्या-त्या राज्यांनी जाहीर केलेल्या २५ रुपये बोनस, असा २३०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जाणार आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात गहू काढणी सुरू झाली असून, हमीभावाने खरेदीही सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> मोठी बातमी : भोरचे आमदार संग्राम थोपटे खासदार सुप्रिया सुळेंबरोबर!

सरासरीपेक्षा जास्त उत्पादन

शक्य यंदाच्या रब्बी हंगामात गहू उत्पादक पट्ट्यात गहू पिकासाठी पोषक असणारी थंडी फेब्रुवारीअखेरपर्यंत राहिली. अवकाळी, गारपिटीचाही फारसा फटका बसला नाही. त्यामुळे गव्हाचे पीक चांगले आहे. मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणात गहू काढणी सुरू झाली आहे. सरासरीपेक्षा जास्त उत्पादन होण्याचा अंदाज भारतीय किसान संघाचे सरचिटणीस दिनेश कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India estimates 1140 lakh tonnes wheat production this year pune print news dbj 20 zws