पुणे : ‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढायच्या, की स्वबळावर, याबाबत स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार आहे. स्थानिक कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या लढविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार सुळे म्हणाल्या, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीत असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यात आल्या होत्या. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असते. पक्ष, संघटनेसाठी कार्यकर्ता केंद्रबिंदू आहे. कोणताही पक्ष किंवा संघटना ही कार्यकर्त्यांशिवाय चालू शकत नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याचा निर्णय घेण्यात येईल.’
हेही वाचा
निवडणूक आयोगाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखाबाबत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘याप्रकरणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे चौकशी करणे अपेक्षित आहे. आता निवडणूक आयोग काय उत्तर देणार, याची आम्ही वाट बघत आहोत.’
‘दोन भाऊ एकत्र आल्यास आनंदच’
‘शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. दोन भाऊ एकत्र येऊन राज्याची सेवा करणार असतील, तर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे,’ असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.