पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क पावसामुळे वॉटर पार्क बनल्यानंतर अखेर राजकीय नेत्यांसह प्रशासनाला जाग आली. आमदार शंकर मांडेकर यांनी सोमवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह (एमआयडीसी) इतर स्थानिक यंत्रणांसह आयटी पार्कमध्ये संयुक्त पाहणी केली. या वेळी नैसर्गिक प्रवाह रोखले गेल्याने पाणी तुंबत असल्याची बाब स्पष्ट झाली.

आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी, पाणी साचण्याची समस्या यांची पाहणी सोमवारी करण्यात आली. या वेळी आमदार मांडेकर यांच्यासह ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, ‘एमआयडीसी’चे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, हिंजवडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि आयटीयन्स उपस्थित होते. यावेळी आयटी पार्क टप्पा दोनमधील डोहलर कंपनीसमोरील रस्त्याची पाहणी करण्यात आली. तिथे पाणी साचण्याची समस्या सर्वाधिक आहे. तिथे एमआयडीसीकडून सांडपाणी वाहिन्या बसविण्याचे काम प्रलंबित आहे. ते तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

आयटी पार्कमध्ये अनेक मोठे निवासी प्रकल्प आणि कंपन्यांनी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह रोखले आहेत. यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडचणी येत आहेत. याच वेळी काही निवासी प्रकल्प आणि कंपन्यांतून प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर सोडले जात आहे. हे पाणी पुढे शेतीजमिनींमध्ये जात आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी संरक्षक भिंती बांधून पाणी जाण्याचा मार्ग रोखला आहे. त्यामुळे पाणी वाहून न जाता रस्त्यावर साचत आहे. या प्रकरणी निवासी प्रकल्प आणि कंपन्यांवर कारवाई करण्याची शिफारस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली जाणार आहे.

मेट्रोच्या ठिकाणी सर्वाधिक समस्या

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा मार्ग आयटी पार्कमधील ८ किलोमीटर रस्त्यावर आहे. त्या रस्त्यावर सर्वाधिक समस्या पाहणीवेळी आढळून आल्या. या रस्त्यावर ठिकठिकाणी मेट्रोच्या कामाचे साहित्य आणि राडारोडा पडलेला आहे. या राडारोड्यामुळे सांडपाणी वाहिन्या तुंबत आहेत. याचबरोबर रस्त्याच्या बाजूचे नालेही बुजविण्यात आल्याने पाणी वाहून जाण्यास मार्ग राहिलेला नाही. यामुळे रस्त्यावर पाणी साचत असल्याचे निदर्शनास आले. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू आहे. कंपनीने मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी असलेला राडारोडा तातडीने उचलावा, अशी सूचना करण्यात आली. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. हे रस्ते व्यवस्थित करावेत, असे निर्देश कंपनीला देण्यात आले.

हिंजवडी आयटी पार्कमध्ये नाले, बांधकाम परवानगीसह अनेक मुद्दे आहेत. आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांची समस्या सोडविण्यासाठी बुधवारी सर्व शासकीय यंत्रणांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत सर्व समस्यांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची पावले उचलली जातील.- डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए

काही निवासी प्रकल्प आणि कंपन्यांकडून प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर सोडले जात आहे. हे सांडपाणी शेतात जात असल्याने काही शेतकऱ्यांनी पाणी जाण्याचा मार्ग अडविला आहे. हे निवासी प्रकल्प आणि कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित कंपनीला दिले आहेत.- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

आयटी पार्कमधील ‘एमआयडीसी’च्या ताब्यातील रस्ते चांगले आहेत. केवळ मेट्रोचे काम सुरू असलेला ८ किलोमीटरचा रस्ता खराब आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची सूचना करण्यात आली आहे. सांडपाणी वाहिन्यांची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहे. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून आयटी पार्कमधील समस्या सोडविण्यात येत आहेत.– नितीन वानखेडे, मुख्य अभियंता, एमआयडीसी