पुणे : विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार ) यांच्या महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले असले, तरी आगामी महापालिका निवडणुकांत युती टिकणार, की युतीतील सर्व पक्ष स्वतंत्र लढणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे. विशेषत: भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे महायुतीतील पक्ष अनुक्रमे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘स्वबळ’ आजमावतील, अशी शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे शहर आणि जिल्ह्याचा विचार करता, महायुतीला २१ पैकी १८ जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील तीन पक्षांकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या असणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्येच या तिन्ही पक्षांच्या अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, बंडखोरी होऊन मतांचे विभाजन झाल्यास त्याचा फटका महायुतीला बसला असता. त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या काहींना पालिकेच्या निवडणुकीत सत्ता आल्यावर महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी देण्याचा ‘शब्द’ दिला आहे. त्यावर विश्वास ठेवून महापालिकेच्या आशेवर अनेकांनी त्यांना दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचा राजीनामा अन् पुण्यातून ही नावे निश्चित! मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली

महापालिकेची निवडणूक या तिन्ही पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून लढवायचे ठरविल्यास अनेक प्रभागांमध्ये सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असणार आहे. त्यामुळे एका पक्षाच्या इच्छुकाला उमेदवारी मिळाल्यास मित्रपक्षातील इच्छुक नाराज होऊन बंडखोरी करतील. सर्वच पक्षांत ही स्थिती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरीला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे या निवडणुकीत महायुती नको, तर स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून व्हायला सुरुवात झाली आहे.

पुणे शहरातील आठपैकी सहा मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर एके ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि एके ठिकाणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा आमदार विजयी झाला आहे. शहरात भाजपची ताकद अधिक आहे. महापालिकेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय झाल्यास जागावाटपाचे सूत्र कसे असणार, हा कळीचा मुद्दा राहणार आहे. महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाचा एकही आमदार शहरात नाही, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच आमदार विजयी झाला आहे. मात्र, या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी इतर मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांचे काम केले असल्याने त्या-त्या विधानसभा मतदारसंघांत येणाऱ्या त्यांच्या वर्चस्वाखालील प्रभागांवर त्यांचे दावे राहणार आहेत. त्यामुळे जागावाटप करताना कसरत करावी लागेल.

विधानसभा निवडणुकीत विजयामुळे सध्याचे वातावरण महायुतीसाठी पोषक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा फायदा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा असणार आहे. या माहितीला महायुतीमधील काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुजोरा देखील दिला. येत्या सहा महिन्यांतच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, या निवडणुका स्वबळावर होतील, की महायुतीमध्ये, यावर अधिकृत बोलण्यास कोणीही तयार नाही. ‘वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील,’ असे उत्तर महायुतीमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.

हेही वाचा – विरोध मद्यसेवनाला, गोंगाटाला, की कोंडीला? दिलजितच्या कोथरूडमधील कार्यक्रमानंतर आगामी कार्यक्रमांवर प्रश्नचिन्ह

पुण्यात नव्याने प्रभागरचना

पुणे महापालिकेत यापूर्वी प्रभागरचना निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेला पुन्हा नव्याने प्रभागरचना करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal corporation election mahayuti will fight together pune print news ccm 82 ssb