पुणे पाणी कपातीच्या मुद्द्य्यावरून आता राजकारण रंगत असल्याचं दिसत आहे. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केलेल्या विधानावर आज राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलताना, फडणवीसांवर पलटवार केला तसेच भाजपावर देखील टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत पाटील म्हणाले, “मला आश्चर्य वाटतं भाजपाने त्यांच्या काळात या शहरात पाणी कपात केली आणि त्यांनीच काल येऊन पाणी कपात करणाऱ्यांना पाणी पाजा असं आवाहन केलेलं आहे. मला खात्री आहे देवेंद्र फडणवीसांचं आवाहन ऐकून पुणे शहर भाजपाला योग्य तो धडा शिकवेल. कारण, त्यांच्या काळात या शहरात पाणी कपात करण्यात आलेली आहे, ती कृतीने त्यांनी केलेली आहे आणि हे जे पत्र आता देण्यात आलेलं आहे. तशी ११ पत्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार काळात चंद्रकांत पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देण्यात आलेली आहेत. पाणी कपात करण्याची नुसती पत्र देऊन ते थांबले नाहीत. तर , त्यांनी एक पंप १८० एमएलडी पाणी कपात जवळपास एक महिना पुणेकरांना सोसायला लावली.”

तसेच, “पुण्याच्या लोकांना आपलं पाणी कसं मिळणार याची चिंता वाटत आहे आणि ही चिंता निर्माण करण्याचं श्रेय मी भाजपाला देईन. कारण, विनाकारण त्यांनी पुणे शहरातील नागरिकांना ही भीती दाखवण्याचं काम केलंय. निवडणूक असल्यावर भाजपा कोणत्याही प्रकारची भीती दाखवण्यात कधी मागे राहिलेला नाही. त्यामुळे काल… मला आश्चर्य वाटतं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अशा पत्राचा उल्लेख करून पाणी कपात करणाऱ्या लोकांना पाणी पाजा असं आवाहन केलं. आता पाणी कपात करणारी भाजपाच होती, सगळ्यात जास्त पत्र त्यांच्याच काळात होती. त्यामुळे पुणे शहरातील नागरिक सूजान आहेत, ते योग्य तो निकाल योग्यवेळी घेतील असा मला विश्वास आहे.” असंही यावेळी जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं.

“…पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही” ; फडणवीसांचं विधान!

तर, सुरूवातील पत्रकारपरिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, कुकडी कालवा समितीची बैठक होती, घोड नदीच्या पाण्याचाही प्रश्न होता. आज सर्व लोकप्रतिनिधी आणि कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. १ जानेवारीपासून कुकडीचं आवर्तन सुरू करण्याचं ठरलं. त्या दरम्यान इतर आवर्तन सुरू करण्याविषयी सल्लामसलत करून निर्णय झाले. मला वाटतं की पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करून, कुकडीचं आवर्तन चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. पुढच्या आवर्तनासाठी लोकप्रतिनिधींची बैठक बसवून त्यावर निर्णय होईल.

याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आज पुणे शहरातील पाण्याबाबत काही चर्चा काल परवा झाल्या, त्याकडे माझे लक्ष वेधले आणि अतिशय आक्रमकतेने त्यांनी पुणे शहरातील पाणी कमी होऊ नये असं सूचवलं. मी त्यांनाही सांगितलं आणि आपल्यालाही सांगतो, की महाराष्ट्र सरकारचा जलसंपदा विभागाचा पुणे शहराचं पाणी कपात करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. आमच्याकडे तो कोणताही विचार झालेला नाही. जे पत्र पुणे महापालिकेला देण्यात आलेलं आहे. त्या पत्राच्या अगोदर देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचं सरकार असताना, अशी ११ पत्र देण्यात आली. ११ पत्र ज्यावेळी देण्यात आली, त्यावेळी पूर्ण पाणी कपात पुण्याची कधी करायची? हाच प्रयत्न आणि इच्छाशक्ती त्यांची असावी, कारण त्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी चार पंप आहेत, त्यामधील १८० एमएलडी क्षमतेचा एक पंप बंद केला. त्याचबरोबर १६ डिसेंबर २०१६ रोजी पर्वती जलशुद्धीकरण कालव्याचं गेट बंद केलं आणि ९ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर २०१८ मध्ये धरण स्थळावरील एक पंप काही तास बंद करून, १८० एमएलडी पाणी पुणे शहरात कपात केली. असं धोरण आमच्या सरकारचं नाही. असंही यावेळी जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune water cut issue jayant patil reply to fadnavis msr 87 svk
First published on: 04-12-2021 at 19:59 IST