पुणे : पुणे आणि मुंबई या शहरांना जोडणाऱ्या ‘दख्खनची राणी’ अर्थात डेक्कन क्वीन’ या रेल्वेचा ९६ वा वाढदिवस रविवारी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. केक कापून गाडीला मानवंदना दिली. तसेच, रेल्वे प्रशासनातील अधिकारी आणि रेल्वे चालकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर हारफुलांनी सजविलेली गाडी ढोल-ताशांच्या गजरात नियोजित वेळेनुसार सकाळी सव्वासात वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

मध्य रेल्वे पुणे विभागाचे वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा, पुणे रेल्वे स्थानक संचालक संजय कुमार, व्यवस्थापक रवींद्र धुमाळ आणि अन्य प्रमुख रेल्वे अधिकारी उपस्थित होते, तर रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा, सदस्य ॲड. आशुतोष रानडे, ॲड. संजय रायरीकर, गणपत मेहता आणि सुधीर शहा या वेळी उपस्थित होते.

हर्षा शहा म्हणाल्या, ‘ही केवळ गाडी नसून, त्यामध्ये आमच्या गेल्या ९६ वर्षांच्या आठवणी, प्रसंग आणि अनुभव आहे. जीवनातील आमूलाग्र बदलामध्ये डेक्कन क्वीनचे महत्त्वाचे योगदान आहे. पिढ्यान् पिढ्या चांगल्या-वाईट आठवणी जपणारी आणि शहरांबरोबरच माणसे जोडून देणाऱ्या या गाडीचे आमच्या हृदयात विशेष स्थान आहे. प्रवाशांना निसर्गरम्य घाटातून प्रवास करताना सह्याद्रीच्या मनमोहक दृश्यांचा आनंद घेता येत असून प्रवासातील आठवणी जगण्याचे विविध पैलू शिकवणाऱ्या आहेत.

असा कालानुरूप बदल

ब्रिटिश राजवटीच्या काळात म्हणजे एक जून १९३० रोजी कल्याण ते पुणे या मार्गावर धावणारी डेक्कन क्वीन, कालांतराने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पुणे जंक्शनदरम्यान धावली. प्रवासाच्या गरजांनुसार तिच्या थांब्यांमध्येही बदल झाले. दादर आणि शिवाजीनगर हे थांबे तिच्या इतिहासाचा भाग बनले. प्रवाशांना आणखी आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गाडीमध्ये ‘डायनिंग कार’ ही सुविधा सुरू करण्यात आली. ज्यामध्ये आधुनिक मुदपाकखाना, उपाहारगृह, मुलायम आसन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था असे बदल करण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सुमारे ९०० गाड्या कल्याण स्थानकावर थांबतात. मात्र, डेक्कन क्वीन याला अपवाद आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वगळता अन्य कोठेही ही गाडी थांबत नाही. दरम्यान, मागील तीन वर्षांपूर्वीपासून डेक्कन क्वीनला ‘विस्टाडोम कोच’ही जोडण्यात आला आहे. अनेक बदल करूनही प्रवाशांच्या मनात किंतु-परंतु न आणता कोणत्याही ऋतूत, बदलत्या हवामानाला तोंड देत प्रवाशांना सुलभ सेवा देणारी दख्खनची राणी आकर्षणाचा केंद्रबिंदू झाली आहे.