पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आभार व्यक्त करताना सामूहिक नेतृत्वाविषयी व्यक्त केलेल्या काही मौलिक कल्पना व्यवहारात आणणे फारसे कठीण नाही असे वाटते. नित्य व्यवहार करताना सामान्य नागरिकाकडून देशसेवा घडू शकते याची उदाहरणेसुद्धा व्यावहारिक वाटावीत अशी आहेत, किंबहुना सुट्टीच्या काळात शाळकरी विद्यार्थ्यांनी देशाच्या ईशान्य भागातील राज्यांना सहलीच्या रूपाने भेट देऊन तेथील जनजीवनाची व संस्कृतीची ओळख करून घ्यावी, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, मणिपूर ही ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखली जाणारी सात राज्ये भारतात असली तरी तेथे सहलीला जाणे हे काश्मीरमधील श्रीनगरला जाण्याइतके सोपे नाही हे प्रथम लक्षात घेतले पहिजे.
राजकीय म्हणा, तेथील संस्कृतीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा घुसखोरीपासून सुरक्षितता यासाठी या सात राज्यांत भारतीय नागरिक मुक्तपणे प्रवास करू शकत नाही. या प्रत्येक राज्यात भारतीय पर्यटक म्हणून जाणाऱ्यास, राज्यानुसार ‘इनर लाइन परमिट’ हा प्रवेश-परवाना आवश्यक  ती  सारी कागदपत्रे दाखल करून घ्यावा लागतो. तसेच अशा पर्यटकास तेथे फार मर्यादित वास्तव्य करण्याची परवानगी दिली जाते. असे परवाने मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेतून जाताना किती वेळ जाईल आणि प्रत्यक्ष तेथे काय पाहता येईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. शिवाय तेथे गेल्यावर स्थानिकाकडून पर्यटकांचे कसे व किती स्वागत केले जाते हा पूर्णपणे वेगळा विषय म्हणावा लागेल!
डॉ. श्रीकांत परळकर, दादर (मुंबई)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पद्मसिंहे रचिला पाया..
‘दादा झालासे कळस’  (१६ जून) या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे घोटाळ्यांच्या इमारतीचा दादा हे कळस आहेत यात शंकाच नाही, पण जरा खोदकाम केले असता असे दिसते की, या इमारतीचा पाया घालण्याचे पवित्र काम राष्ट्रवादी परंपरेतील एक थोरपुरुष वस्ताद पद्मसिंह महाराज उस्मानाबादकर यांनी १९९९ मध्ये केले. राज्य सरकारच्या पाटबंधारे खात्याचे मंत्री झाल्यावर १९९९ ते २००४ या त्यांच्या कारकिर्दीच्या काळात नद्यांचे आणि पाटाचे पाणी वळविण्याच्या, मुरविण्याच्या आणि जिरविण्याच्या साधनेमुळे राष्ट्रवादीच्या या इमारतीचे काम भक्कम झाले होते. त्यामुळे नंतर बरीच वादळे, धरणीकंप होऊनही इमारतीस हानी पोचली नाही.
 नंतरच्या काळात तटकरे यांनी बरेच सिंचन करून, गिलावा मारून इमारत उंच व टोलेजंग केली आणि आता दादा महाराजांनी धरणाचे पाणी उपसून त्यावर कळस बांधला; पण इमारत उंच करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेत कळसावर तांब्याची विद्युतवाहक तार बसविण्याचे अनावधानाने राहून गेले असावे. त्यामुळे आता येत्या पावसाळ्यात वीज पडली तर इमारतीला धोका निर्माण झाला आहे. अहवालाचे काळे ढग जमा होऊन गडगडाट सुरू झाल्यामुळे सध्या भीतीने इमारत मोकळी होऊ लागली आहे, असे म्हणतात.
चिदानंद पाठक, पाषाण, पुणे.

देवळांचाही बाजार सुरू; तेथे जातीचे काय!
‘प्रबोधन पर्व’ या सदरात ‘पुराणे म्हणजे शिमगा’ हे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे तेजस्वी विचार वाचले व त्याच दिवशी (१४ जून) ‘लोकमानस’मधील ‘सामाजिक क्रांतीची संधी महाराष्ट्राने गमावू नये’ हे पत्रही वाचले. कोणत्याही मंदिरात देवाची पूजाअर्चा करण्याचा अधिकार केवळ एकाच जातीतील लोकांना असू नये हे जितके खरे, तितकेच त्या ठिकाणी दुसऱ्या जातीतील व्यक्ती पूजा करायला आली की ती आधीच्या पुजाऱ्यांप्रमाणेच वागणार नाही हे कशावरून?
 ‘भाव तिथे देव’ हे अद्यापही जनास उमगत नाही हेच खरे. आपल्या आचरणात, मनात पंढरी असला की, मंदिरात जाऊन पूजा करण्याची गरज भासत नाही. वास्तविक कोणत्याही जत्रेला किंवा मंदिरात गेले की मनाला उबग यावी असेच वातावरण असते. तेथील पूजाअच्रेच्या सामानांच्या दुकानदारांची लुबाडण्याची मनोवृती, जास्त पसे दिल्यास वेगळ्या रांगेने दर्शन, भिकाऱ्यांचे थवे व देवाची सेवा करणाऱ्या पुजारी-भटजींची व्यापारी वृत्ती मनास उबग आणते. देवाच्या दारी चाललेला हा प्रकार पाहून आपण इथे का आलो, हा प्रश्न पडतो.   
वारकरी संप्रदायात मूठभर ना-लायकांचे कोंडाळे माजले आहे, असे पत्रात म्हटले आहे; परंतु वारकरी संप्रदायात नेहमीच ‘भजनात एकी, भोजनात बेकी’, असाच प्रकार चाललेला आहे. अद्यापही खेडोपाडीच्या गोरगरीब शेतकरी व शेतमजुरांचा उन्हाळ्यात शेताची मशागत झाली, पहिला पाऊस पडून पेरणी झाली, की मनाचा विरंगुळा किंवा शांती म्हणून वारीला निघण्याचा प्रघात आहे. गोरगरीब वारकरी आषाढी एकादशीला पायी चालत, टाळ कुटत, ग्यानबा तुकारामचा घोष करत पंढरपूरला जातात. दुरूनच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतात व परत पायी फिरतात.
खरे म्हणजे मंदिरात जाऊन पूजा करण्याचा हक्क मागण्यापेक्षा सर्वानीच जर बाहेरून दर्शन घेऊन, देवाला भक्तिभावाने हात जोडून परत फिरल्यास या पुजारी वर्गाचे धाबे दणाणेल. नाडणारी कामे सोडून देतील व खरे भक्त सेवाभावी वृत्तीने देवाची सेवा करतील. शेवटी ‘शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपल्या अंतरी’ हे जोपर्यंत उमगत नाही तोपर्यंत हे असेच चालणार.
दिनकर र. जाधव, मीरा रोड.

स्मारके जपावीत कोणी?
‘शिवरायांच्या कन्या व जावयाच्या स्मारकात दारुडय़ांचा अड्डा’ ही  बातमी (रविवार, १५ जून) पाहिली, वाचली व अनेक प्रश्न डोक्यात निर्माण झाले.  प्रत्येक जिल्ह्यात कोणा ना कोणा इतिहासकालीन व्यक्तींचे वाडे, समाध्या, चबुतरे व वृंदावने तसेच किल्ले व इतर इतिहासकालीन वास्तू असणारच. पण त्यांच्या पडझडीची केवळ सरकारवर जबाबदारी टाकून टीका करायची ही कल्पना योग्य वाटत नाही.
 अशा गोष्टी ज्या गावांत किंवा जिल्ह्यांत आहेत तेथील स्वयंसेवी संस्थांनी त्याच्या देखभालीची जबाबदारी लोक वर्गणीतून घ्यावी. त्यामुळे त्या त्या गावांची शान वाढून त्या गावातील वा जिल्ह्यातील पर्यटनालाही चालना मिळेल.. ज्या ठिकाणी खर्च स्थानिक जनतेला परवडणारा नसेल तेथील स्थानिक संस्थांच्या आíथक सहकार्यातून अपेक्षापूर्ती करता येईल. निदान सुरुवात म्हणून अशा ठिकाणी त्या ठिकाणाचे किंवा वास्तूचे महत्त्व सांगणाऱ्या माहितीपूर्ण पाटय़ा लावून वर्षांतून एकदा स्थानिक पातळीवर उत्सव केला तर त्यांच्या स्मृती खऱ्या अर्थाने जागवल्या, असे होऊन पुढील पिढय़ांसाठीही ते  स्फूíतदायी ठरेल.
प्रसाद भावे, सातारा</strong>

दुसरी खेप धोक्याची..?
माणूस कितीही हुशार आणि प्रामाणिक असला तरीही काळाप्रमाणे यश आणि अपयश हे बदलत असते, सद्य:परिस्थितीत ही बाब दोन उदाहरणांनी स्पष्ट झाली आहे.
 मनमोहन सिंग आणि नारायण मूर्ती हे दोघेही पहिल्या इनिंग्जमध्ये ग्रँडमास्टर होते. सिंग यांनी भारताच्या आíथक धोरणात आमूलाग्र बदल करून भारताचा आíथक वाढ दर आठ ते नऊ टक्क्यांपर्यंत नेला. तसेच नारायण मूर्ती यांनी इन्फोसिससारखी कंपनी चालू करून नावारूपाला आणली आणि जागतिक स्तरावर भारताचा झेंडा रोवला. खरे तर भारतातील लाखो मध्यमवर्गाला या दोघांमुळे सुखाचे दिवस आले. आज काळ सोकावू पाहताना दोघांची दुसरी इिनगही पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सिंग यांच्या दुसऱ्या खेपेमध्ये आíथक दर ४.६ टक्क्यांवर आला, तर मूर्ती यांच्या दुसऱ्या खेपेमध्ये इन्फोसिसची अवस्था ही ‘इन्फोएग्झिट’ (इन्फोगळती!) अशी झाली आणि त्यामुळे दोघांचे पायउतार होणे ही काळाची गरज ठरली. आता भारताची धुरा नरेंद्र मोदी यांसारख्या सशक्त नेत्याकडे आहे, तर इन्फोसिसची धुरा विशाल सिक्का यांच्यासारख्या मातबर आणि तरुण नेत्याकडे आहे आणि हे दोघेही आपल्याला चांगले दिवस दाखवतील, हीच आशा करू या.  
 – नोएल डिब्रिटो, वसई

मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is that tourism easy in states north east