डोंबिवली – मुंब्रा रेल्वे अपघातानंतर प्रवाशांकडून टीकेची झोड उठल्यानंतर खडबडून जागे झालेल्या मध्य रेल्वे प्रशासनाने कल्याण ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस दरम्यान सकाळ, संध्याकाळच्या वेळेत पूर्ण क्षमतेने १५ डब्यांच्या लोकल चालविण्या संबंधित चाचपणी सुरू केली आहे. बुधवारी रात्री मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ अभियंते यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकात पाहणी केली. या अधिकाऱ्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकातील गृह फलाटाची (होम प्लॅटफाॅर्म) पंधरा डब्याची लोकल सोडण्यासाठी लांबी वाढविण्याच्या दृष्टीने चाचपणी केली अशी माहिती मध्य रेल्वेतील एका विश्वसनीय सुत्राने दिली.

मुंब्रा येथे सोमवारी रेल्वे मार्गाच्या एका वाकावर वेगात असलेल्या दोन लोकल जवळ आल्याने प्रवाशांच्या पिशव्या एकमेकाला घासल्या. यावेळी एकूण १३ प्रवासी रेल्वे मार्गात पडले. यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला. हे वळण लोकल वेगात असेल तर प्रवाशांच्या जीवाला घातक आहे. याविषयी गांभीर्याने विचार करण्याची मागणी दिवा येथील रहिवासी आनंदा पाटील, मुंब्रा रेल्वे प्रवासी संघटनेचे रफिक शेख, इतर रेल्वे प्रवासी संघटनांनी अधिकाऱ्यांकडे दोन वर्षापूर्वी केली होती. त्याची दखल प्रशासनाने घेतली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.

मुंब्रा रेल्वे अपघाताच्या घटनेवर न्यायालयाने तुम्हील प्रवाशांना लोकलमधून गुरासारखे कोंबुन नेता, असे उद्विग्न मत नोंदवले आहे. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सकाळ, संध्याकाळच्या वेळेत कल्याण, डोंंबिवली येथून सीएसएमटी दिशेने आणि सीएसएमटी ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होण्यासाठी पंधरा डबा लोकल सोडता येईल का, या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. अलीकडे पंधरा डब्याची लोकल धावते. या लोकलसाठी पूर्ण क्षमतेच्या लांबीचे फलाट उपलब्ध नसल्याने एक ते दोनच फेऱ्या होतात.

बारा डब्यांप्रमाणे पंधरा डब्यांच्या लोकल सकाळ, संध्याकाळ पूर्ण क्षमतेने चालविल्या तर कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानका दरम्यानच्या प्रवाशांना रेटारेटी न करता लोकलमधून प्रवास करण्याची गरज लागणार नाही. हा विचार करून रेल्वे प्रशासनाने पंधरा डब्यांच्या लोकल पूर्ण क्षमतेने चालवून, त्यांच्या लोकल फेऱ्या वाढविण्याच्या दृष्टने हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती एका विश्वसनीय रेल्वे सुत्राने दिली.

बुधवारी रात्री रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते डोंबिवली रेल्वे स्थानकातील गृह फलाट येथे आले होते. त्यांनी गृह फलाटापासून कल्याण, दिवा दिशेने पंधरा डब्याच्या लोकलसाठी फलाटाची लांबी कशी वाढविता येईल या दृष्टीने मोजणी केली. पंधरा डब्याच्या लोकलसाठी ३३० मीटरचा फलाट लागतो, असे या अधिकाऱ्याने सांगितले. अशीच पाहणी दिवा, मुंब्रा, कळवा रेल्वे स्थानकांत करण्यात आल्याचे समजते.

याविषयी ठोस माहिती नाही. पण पंधरा डब्याच्या लोकल सकाळ, संध्याकाळी गर्दीच्या वेळेत सोडण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासन करणार असेल तर त्याचे स्वागत आहे. आम्ही ही मागणी पंधरा डबा लोकल प्रवासी सेवेत आल्यापासून करत आहोत.

लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ.