लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूरः मार्च महिन्यात वर्षातला सर्वात पहिला उष्ण दिवस १८ फेब्रुवारी ठरला होता. त्यानंतर सोमवार एप्रिल महिन्यातला सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरात पारा चाळीशीपार झाला होता. तर बहुतांश शहरातील तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्याचा अनुभव येत होता. आणखी चार ते पाच दिवस तापमानात अशीच वाढ होणार असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे.

तापमानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे मार्च महिन्यात पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा अशा तीनही ऋतुंचा अनुभव आला. होता. मार्च महिन्याच्या सुरूवातीला धुळवडीने धावपळ उडवली होती. त्यानंतर तापमानात वाढ झाली. दुसऱ्या आठवड्यात १६ मार्च रोजी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर तापमानात घट पाहायला मिळाली होती. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट नोंदवली जात असतानाच हिवाळ्याचा अनुभव येत होता. एप्रिल महिन्यात सुरूवातीला ढगाळ वातावरण होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तापमानात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. बदलापुरातील खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

हेही वाचा… कल्याण मधील गांधारी नदीत भराव टाकून बेकायदा बांधकामांची तयारी?

हेही वाचा… ठाकुर्लीत मोबाईल चोरी करणारा अटकेत

जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात 41.6 अंश सेल्सियस तापमानाची सोमवारी नोंद झाली. त्या खालोखाल बदलापूर शहरात सर्वााधिक ४०.१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. त्याखालोखाल कल्याण शहरात 40 तर डोंबिवली शहरात 39.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्याची माहिती अभिजीत मोडक यांनी दिली आहे. ठाणे शहरातही 39.8 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. मुंब्रा आणि नवी मुंबई शहरात अनुक्रमे 39.3 आणि 39.2 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. शेजारच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरात महानगर क्षेत्रातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले असून कर्जतमध्ये पारा 42.6 अंश सेल्सियवर पोहोचला होता. त्यामुळे सोमवार हा एप्रिल महिन्यातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात वर्षातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी 18 मार्च रोजी जिल्ह्यातील तापमान पहिल्यांदा चाळीशीपार गेले होते.

पुढचे चार दिवस चटक्याचे

अरबी समुद्रात तयार झालेल्या उच्च दाबामुळे उत्तरेतील हवा येत असल्याने जिल्ह्यातील तापमानात वाढ नोंदवली जात असल्याची मााहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. येत्या 14 ते 15 एप्रिलपर्यंत अशाच प्रकारे तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येईल. तसेच हा पारा 42 अंश सेल्सियपर्यंतही जाऊ शकतो अशीही शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane district hottest day recorded of april month temperature is above 40 degree celsius dvr