ठाणे : ठाण्यातील आझाद नगर नं. २ येथील जय भवानी मित्र मंडळाच्यावतीने ३९ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १९८७ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाकडून दरवर्षी समाजाला जागरूक करणारे आणि विचार करायला लावणारे विषय निवडले जातात. मागील वर्षी ‘निष्काळजीपणामुळे होणारी जिवितहानी’ हा विषय घेऊन अपघातांच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता. यावर्षी मात्र मंडळाने देशभक्तीचा उत्साह वाढवणारा “दहशतवाद ठेचलाच पाहिजे” हा देखावा साकारला आहे.

ठाण्यातील जय भवानी मित्र मंडळ यांच्यावतीने यंदा सजावटीमध्ये देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले दाखवण्यात आले आहेत. त्यामध्ये १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, २००२ सालचा घाटकोपर बस बॉम्बस्फोट, ११ जुलै २००६ रोजी उपनगरीय रेल्वे मार्गावरील मालिका बॉम्बस्फोट, २६/११ मुंबई हल्ला तसेच १४ फेब्रुवारी २०१९ जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या सीआरपीएफ वाहनांच्या ताफ्यावर एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला. ज्यामध्ये ४० भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले. या सर्व घटना वेधक पद्धतीने दाखवल्या आहेत.

त्याचबरोबर २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू आणि १७ जण जखमी झाले होते. या घटनेचे चित्रणही या देखाव्यात आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्यानंतर राबविण्यात आलेल्या ‘ ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती चलतचित्रांद्वारे दाखविण्यात आली आहे. या मोहिमेत शहीद झालेल्या जवानांची छायाचित्रे, तसेच यश मिळवून देणाऱ्या तीन महिला कमांडरचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे. मंडळाने या माध्यमातून देशातील वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केले आहे.

प्रतिकात्मक गणेशमूर्ती

यंदा मंडळातील गणेशमूर्तीच्या हातात शस्त्र दाखवून “दहशतवाद संपवला जात आहे” हे प्रतिकात्मक दृश्य उभारण्यात आले आहे. संपूर्ण सजावटीतून दहशतवादाविरुद्ध जागरूकता आणि देशभक्तीची प्रेरणा देण्याचा प्रयत्न आहे.

शासनाला विनंती

दहशतवाद पुन्हा हल्ला करू शकतो त्यामुळे मंडळाने या देखाव्यातून शासनाला विनंती करण्यात आली आहे की आपल्या देशाच्या सीमा मजबूत करा तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना आर्मीचे शिक्षण देण्यात यावे. जेणेकरून येणारी पिढी वेळप्रसंगी अतिरेक्यांशी युद्ध करून त्यांचा खात्मा करेल आणि अतिरेकांच्या हल्ल्याला बळी पडणार नाही.

– मागील वर्षी केली होती अशी सजावट जय भवानी मित्र मंडळाने मागील वर्षी ‘निष्काळजीपणामुळे होणारी जिवितहानी’ हा ज्वलंत विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला होता. यामध्ये त्यांनी मुंबई आणि इतर ठिकाणी होर्डिंग मुळे झालेले अपघात, लोणावळा येथील पर्यटन स्थळी धबधब्यावर झालेला अपघात, पावसात पूल ओलांडताना झालेला अपघात तसेच धबधब्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने रील बनवताना झालेले अपघात अशाप्रकारे पाण्याजवळचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर देतो अशा विविध घटना या देखाव्यामध्ये साकारल्या होत्या.