कल्याण : मेव्हुणाचा खून केल्याचा आरोप असलेल्या डोंबिवली जवळील ९० फुटी रस्ता भागातील खंबाळपाडा येथील एका इसमाची कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयेच अपर जिल्हा न्यायाधीश एस. जी. इनामदार यांनी या गुन्ह्याच्या तपासातील त्रृटी आणि सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
खंबाळपाडा येथे राहणारे रामेश्वर वेलस्वामी तेवर (२८) यांच्यावर मरीकानी तेवर या त्यांच्या मेव्हुणाचा खून केल्याचा आरोप होता. मे २०२३ मध्ये खंबाळपाडा भागातील रवींद्र शेलार चाळीत घरगुती वादातून हा खून झाला होता. रमेश तेवरची बहिण विजयालक्ष्मी ही मरीकानी तेवर याची पत्नी होती. तेवर पती, पत्नीमध्ये घरगुती वाद होत होते. आपल्या बहिणीला त्रास का देतो, या विषयावरून रामेश्वर मरीकनीला जाब विचारत होता. या वादातून रामेश्वर आणि मरीकनी यांचे दोन वर्षापूर्वी जोरदार भांडण झाले. यावेळी रामेश्वरने रागाच्या भरात मरीकानी तेवर याचा खून केला होता. याप्रकरणी गु्न्हा दाखल होताच पोलिसांनी रामेश्वरला अटक केली होती.
या प्रकरणाच्या न्यायालयात सुनावण्या सुरू झाल्यानंतर उलट तपासणीच्यावेळी या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आरोपीची बहिणी विजयालक्ष्मी, तिचा भाऊ आणि इतर दोन साक्षीदार यांनी न्यायालयासमोर आश्चर्यकारक आपल्या मूळ साक्षी बदलल्या. त्यामुळे न्यायालयाने याप्रकरणाचा तपास करताना विश्वासर्ह, सबळ असा एकही पुरावा दिसत नाही. त्यामुळे आरोपीला कोणत्या पुराव्याच्या आधारे दोषी ठरविणार असा प्रश्न केला. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार विजयालक्ष्मीने असा काही प्रकार घडल्याचे आपण पाहिले नाही आणि आपला भाऊ, पतीमध्ये काही वाद झाला नसल्याची भूमिका घेतली. दाखल प्राथमिक तपासणी अहवालापेक्षा मुख्य साक्षीदारांनी विपरित भूमिका घेतल्या. उलट तपासणीच्यावेळीही साक्षीदार आपल्या फिरवलेल्या भूमिकेवर ठाम राहिले.
शवविच्छेदन अहवालाप्रमाणे मयताच्या छातीवर वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. पण या प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने आणि सबळ पुरावा नसल्याने न्यायालयाने रामेश्वर तेवर यांची खुनाच्या आरोपातून निर्दाेष मुक्तता करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. मागील तीन वर्षापासून रामेश्वर याप्रकरणात तुरूंगात असल्याने त्यांची अन्य गुन्ह्यात पोलिसांना गरज नसेल तर त्यांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले.