कल्याण : कल्याण शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घराण्यातील एका महिलेने आपल्या गुढी तयार करण्याच्या व्यवसायातील एक पर्यावरणपूरक देखणी गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्ली येथील त्यांच्या घरी चैत्र पाडव्याच्या दिवशी उभारण्यासाठी पाठविली आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी आणि संस्कृती संवर्धनासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांतून आपण आदरभावाने ही गुढी पंतप्रधानांना खासगी टपालाने पाठविली आहे, अशी माहिती या गुढी व्यवसायातील मुख्य प्रवर्तक मेधा मोहन आघारकर यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याशिवाय अनेक मान्यवरांना आपण पर्यावरणपूरक गुढ्या पाठविल्या आहेत, असे मेधा आघारकर यांनी सांगितले. सध्याच्या धकाधकीत, नोकरी, व्यवसायाच्या व्यापात अनेकांना चैत्र पाडव्याच्या दिवशी घराच्या दारासमोर बांबू आणून गुढी उभारणे शक्य होत नाही. आताच्या नवतरूण पीढीला गुढी उभारण्याचे महत्व, त्यामधून होणारे आपल्या संस्कृती रक्षणाचे कार्य याविषयी माहिती मिळावी. आपली हिंदू संस्कृतीची हजारो वर्षाची गुढीची परंपरा पुढे चालू राहावी म्हणून मेधा यांनी पंधरा वर्षापूर्वी घर बसल्या कागद, कपड्याच्या पर्यावरणपूरक गुढी बनविण्यास सुरूवात केली. सुरूवातील दोन ते तीन महिलांच्या साहाय्याने तयार करण्यात येणाऱ्या या गुढी तयार करण्यासाठी मेधा यांच्याकडे आता १५ महिला काम करतात. रोजगाराचे एक साधन या निमित्ताने तयार झाले आहे. केवळ व्यापारी उद्देशातून या गुढ्या आपण तयार करत नाहीत तर, आपल्या संस्कृतीची परंपरा पुढे जावी या दूरगामी विचारातून आपण या गुढ्या तयार करत आहोत, असे मेधा यांनी सांगितले.

हेही वाचा : “लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

या गुढ्या तयार करणाऱ्या महिला त्यांच्या ओळखीतील लोकांना या पर्यावरणपूरक गुढ्या विकतात. त्यामधून त्यांची मजुरी निघते. डिसेंबरपासून या कामाला सुरूवात केली जाते. दोन हजार छोट्या आकाराच्या गुढ्या तयार केल्या जातात. मुंबई उच्च न्यायालयातील एका महिला न्यायमूर्तींंनी या पर्यावरणपूरक गुढीचे कौतुक करून आपला सन्मान केला होता. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी बाजपेयी यांना या गुढीचे आकर्षण होते. त्यांनी त्यांच्या कालावधीत एक हजाराहून अधिक पर्यावरणपूरक गुढ्यांची मागणी केली होती. वीर मणी हे उद्योजक आपल्या दुकानासमोर दरवर्षी आपली पर्यावरणपूरक गुढी उभारतात. घरगुती पध्दतीने आपण हा व्यवसाय छंद म्हणून करतो. करोना काळात आपली सून आणि आपण या गुढ्या करून सोसायटीच्या प्रवेशव्दारात जाऊन इच्छुकांना दिल्या होत्या.

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर मजुरावर चाकू हल्ला, मजुरीचे दोन हजार रूपये लुटले

पाच वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. अयोध्येत राम मंदिर उभारून भक्तांची मागणी पूर्ण केली. भक्तांच्या मनातील आनंंद गुढीच्या रुपाने त्यांच्यापर्यंत पोहचावा. आपली पर्यावरणपूरक गुढी त्यांनी घरात उभारून आनंदोत्सव साजरा करावा, या उद्देशातून आपण यावेळी पंतप्रधान मोदींना पर्यावरणपूरक गुढी पाठविली आहे, असे आघारकर यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल उद्योजकता मेळाव्यात, कल्याण भूषण पुरस्काराने आघारकर यांना गौरविण्यात आले आहे.