कल्याण: डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या दहशतीमुळे लोक यापूर्वी कार्यकर्ते ठाण्यात, यांच्या समोर जायला घाबरायचे. कार्यकर्ते, लोक यांच्या विषयी आता उघडपणे बोलू लागले आहेत. कार्यकर्त्यांची हिम्मत आता वाढू लागली आहे. खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता दहशतवाद मुक्त झाला आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी रविवारी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार गट) डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदुराव यांनी डाॅ. आव्हाड यांच्यावर टीका केल्याने ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या दोन गटात जोरदार कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून फुटून राज्यामधील सत्तेत सहभागी झाल्याच्या घटनेनंतर कल्याणमध्ये प्रथमच अजित पवार यांचे खंदे समर्थक उपाध्यक्ष हिंदुराव यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. मेळाव्यानंतर हिंदुराव यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादीमधून फुटून शिवसेना-भाजप बरोबर राज्यातील सत्तेत सामील झाल्यापासून डाॅ. आव्हाड सातत्याने अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्याचा समाचार रविवारी हिंदुराव यांनी आपल्या भाषणात घेतला.

हेही वाचा >>> कल्याणजवळील म्हारळ येथे खदानीत तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसमधील उलथापालथीमुळे आता खऱ्या अर्थाने ठाणे नव्हे तर कल्याण हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे असेल, असे हिंदुराव म्हणाले. त्यांच्या (डाॅ. आव्हाड) दहशतीमुळे यापूर्वी कार्यकर्ते ठाण्यात, त्यांच्या समोर जायला घाबरायचे. आता कार्यकर्ते त्यांच्या विषयी हिम्मत करुन उघडपणे बोलू लागलेत. तिकडे राहिलेले येत्या काळात अजित पवार गटात दाखल होतील. त्यांना लवकरच शहाणपण सुचेल, असा विश्वास हिंदुराव यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> बेकायदा बांधकामांचे ‘कल्याण’! मुख्यमंत्रीपुत्राच्या मतदारसंघातील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा घाट

कुणामुळे कोण पक्ष सोडून गेले, यापेक्षा आमच्या सौहार्दामुळे कोण जोडले जात आहे. जोडले जाणार आहे. याचा आमाचा आता अधिक प्रयत्न असेल. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे टाकण्यापेक्षा आम्ही आता सक्षम झालो आहोत. आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. आमच्या सोबत जे येणारे आहेत. त्यांना पुढे नेण्याचा, त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठाणे जिल्ह्यासह इतर भागातील ताकद वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे हिंदुराव म्हणाले. कार्यकर्त्यांचे संघटन, पक्ष बांधणी कल्याण परिसरातील विविध नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्याण येथे आणले जाईल, असे हिंदुराव यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp party free from terrorism in thane district pramod hindurao criticism of jitendra awad ysh