Final Phase of Samruddhi Mahamarg : ठाणे : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिमच्या टप्प्याचे (इगतपुरी ते भिवंडीतील आमणे ) लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येत आहे. या लोकार्पणानंतर समृद्धी महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होणार आहे. असे असले तरी समृद्धी महामार्गाने मुंबईत येण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडीतील येवई ते माजिवडा, नितीन कंपनी, तीन हात नाका येथील कोंडीतून खडतर प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागपूर ते आमणे असा सुसाट प्रवास केल्यानंतर मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुक कोंडीचा ताप नागरिकांना सहन करावाच लागणार आहे. त्यामुळे आठ तासांत मुंबई गाठता येईल का हा प्रश्न निर्माण होत आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

नागपूर ते मुंबईचा १८ तासांचा प्रवास आठ तासांवर यावा यासाठी ७०१ किमी लांबाचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग निर्माण करण्यात आला आहे. नुकतेच या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच, इगतपुरी ते आमणे या ७६ किमी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्याचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. यापूर्वी या महामार्गाचे तीन टप्पे वाहतुकीसाठी खुले झाले होते. यातील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी, दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर, तिसरा टप्पा भरवीर ते इगतपूरी असा होता. पहिल्या टप्प्याचे (५२० किमी) लोकार्पण डिसेंबर २०२२ मध्ये झाले होते. दुसऱ्या टप्प्याचे (८० किमी) लोकार्पण मे २०२३ मध्ये तर तिसऱ्या टप्प्याचे (२५ किमी) लोकार्पण मार्च २०२४ मध्ये झाले होते. इगतपुरी ते आमणे हा टप्पा सुरु झाल्यानंतर इगतपुरी ते आमणे या प्रवासासाठी पूर्वी अडीच तास लागत होते. हा अडीच तासांचा प्रवास अवघ्या ४५ मिनीटांत होणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे.

समृद्धी महामार्गावरील नागपूर ते आमणे अवघ्या आठ तासांत आणि इगतपुरी ते आमणे हा प्रवास ४५ मिनीटांत होणार असला तरी आमणे पुढील प्रवास करताना प्रवाशांच्या नाकी नऊ येण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्ग आमणे येथे पूर्ण झाल्यानंतर येथून मुंबई गाठण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गाने येवई, सरावली, मानकोली, खारेगाव, साकेत, माजिवडा हा अतिशय खडतर प्रवास करत प्रवाशांना मुंबई गाठायची आहे. सध्या माजिवडा ते वडपे या मार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी कोंडीतून समृद्धी मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना भिवंडीतील प्रवासाचा कठीण टप्पा पार करावा लागणार आहे.

माजिवडानंतरचा प्रवास आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. माजिवडा गाठल्यानंतर पुढे पूर्व द्रुतगती महामार्गाने कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, तीन हात नाका, मुलुंड असा प्रवास करावा लागणार आहे. माजिवडापुढे ठाणे, घोडबंदर भागातील वाहनांचा भार असतो. येथील वाहिन्या अतिशय अरुंद आहेत. त्यात अवजड वाहनांचा भार अधिक असतो. यामध्ये समृद्धी महामार्गाच्या वाहनांचा भार वाढल्यास कोंडीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्गाची समृृद्धी झाली तरीही त्यापुढील प्रवासाचे काय असा प्रश्न चालकांना पडणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samruddhi highway open but mumbai access passes through congested bhiwandi to teen hat naka sud 02