ठाणे : राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करीत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार पक्ष) ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसेच काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी ‘काळी दिवाळी’ साजरी केली. तसेच कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, मूग, ऊस, उडीद आदी विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले. पण आतापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी निम्म्या हेक्टरवरील पंचनामे अद्यापही बाकी आहेत. ते पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल हे माहित नाही. अतिवृष्टीने काढणीला आलेली पिके वाहून गेली, गोठ्यातील दुभती जनावरं, बैल, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या तरी या सरकारनेही अद्याप मदत दिलेली नाही. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेत शेतकरी आहे. मात्र, सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, त्यानिषेधार्थ हे आंदोलन असल्याचे शरद पवार गटाने सांगितले.

यावेळी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ७५ हजार रुपये देण्याची आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेवर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरीत मिळावी, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, गिरणा ते मन्याड जोड कालवा यांसारख्या प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, शेती पंचनामे वेळेवर न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, दिव्यांग शेतकरी, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

पॅकेजच्या नावाखाली या सरकारने अतिवृष्टीग्रस्तांची मोठी फसवणूक केली आहे. दिवाळीपूर्वी मदत जाहीर करण्याचं आश्वासन तर हवेतच विरले. सरसकट कर्जमाफी करण्याची आज खरी गरज असताना सरकार कर्जमाफीचा ” क ” शब्दही उच्चारायला तयार नाही. हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याऐवजी केवळ आकडेमोड करून शेतकऱ्यांना चुना लावण्याचं काम केले. पण आम्ही मात्र त्यासाठी जनतेच्या सहकार्याने रस्त्यावरचा संघर्ष करू आणि या सरकारला सरसकट कर्जमाफी, हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि यासह इतर सर्व मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान म्हणाले.