देशभरात आज भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असताना, त्यानिमित्ताने राज्यकारभाराचा, समाजकारणाचा गाडा हाकण्याचा अनुभव असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने त्यांना लिहिलेले हे अनावृत पत्र..

प्रिय नरेंद्रभाई,

सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आपण ६७ वर्षांचे झालात. आज वयाच्या ६७व्या वर्षी देशाच्या पंतप्रधानपदी असणे ही निश्चितच अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन भारतासारख्या खंडप्राय देशाचे पंतप्रधान होणे ही काही साधी बाब नव्हे! अर्थात यामागे तुमचे मोठे कष्ट आणि साधना आहेच. भारतासारख्या एवढय़ा मोठय़ा देशात प्रचंड मेहनत करणारे आणि गुणवत्ता असलेले अनेक लोक असतात, पण सर्वच लोक पंतप्रधान होऊ  शकत नाहीत. तुम्ही मात्र तुमच्या कष्टानेच पंतप्रधान झालात. तुमचं अभिनंदन करायचं ते यासाठीच. रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करणारे डॉक्टर मनमोहन सिंह या देशाचे पंतप्रधान होतात, रेल्वे स्टेशनवर चहा विकणारे तुम्हीदेखील या देशाचे पंतप्रधान झालात, हे या देशाच्या लोकशाहीचे मोठे यश आहे. लोकसभेत पहिल्यांदा जाताना तुम्ही लोकशाहीच्या या मंदिराच्या पायरीवर माथा टेकवलात आणि लोकशाही पद्धतीने होणाऱ्या चर्चेवर आपला विश्वास आहे हे दाखवून दिलेत.

२६ मे २०१४ रोजी जेव्हा तुम्ही या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतलीत तेव्हा या देशातील अगदी सामान्य कुटुंबापासून सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांपर्यंत सर्वानी तो सोहळा डोळे भरून पाहिला. तुम्हाला शपथ घेताना पाहून या देशातील लाखो लोकांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. किती प्रचंड अपेक्षा होत्या लोकांच्या त्या क्षणाला तुमच्याकडून. प्रत्येक जण म्हणत होता, आता या देशातील गरिबी पूर्णपणे दूर होणार, बेरोजगारी नष्ट होणार, दोन कोटी युवकांना दर वर्षी रोजगार मिळणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये जमा होणार, आपण चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवणार, देशात आता लोकांना त्यांची कामे करायला चिरीमिरी द्यावी लागणार नाही, भ्रष्टाचार हा शब्दच इतिहासजमा होईल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्णपणे थांबतील, वगैरे वगैरे..

पण आज तुमच्या सत्तारोहणाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर काय परिस्थिती आहे? देशाचा विकासदर जवळपास दोन टक्क्य़ांनी खाली आला आहे. देशाचा विकासदर दोन टक्क्यांनी कमी होणे म्हणजेच देशाचे दोन लाख चाळीस हजार कोटींचे नुकसान होणे होय. तुम्ही सत्तेत आल्यानंतरही दर वर्षी हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. निश्चलनीकरणामुळे लघु आणि मध्यम उद्योजक उद्ध्वस्त झाला आहे. अगदी उच्चशिक्षित मुलांनाही येथे नोकऱ्या नाहीत, तर इतरांची काय अवस्था असेल? सीमेवर रोज जवान शहीद होत आहेत. कोणी आपला मुलगा गमावतोय, तर कोणी आपला पिता, तर कोणी पती. अक्षरश: रोज एखादा जवान शहीद झाल्याची बातमी आम्हाला वर्तमानपत्रात वाचावीच लागते. काश्मीरमध्ये मुली आणि महिलांनी दगड हातात घेतल्याची दृश्ये आम्ही पाहतो आहोत. आपल्या देशात गरीब अजून गरीब होत चालला आहे. काही मोजके श्रीमंत तुमच्या आशीर्वादाने अजून श्रीमंत होत आहेत. तुमच्या राज्यात महिलांपेक्षा गाई अधिक सुरक्षित आहेत.

पंतप्रधान महोदय, आज कधी नव्हे इतका या देशातील दलित आणि मुस्लीम असुरक्षित आहे. त्याला स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जिवाची काळजी वाटते आहे. कधी कुठून कोणती झुंड येईल आणि आपल्यावर गोमांस ठेवल्याच्या संशयावरून हल्ला करील याची त्यांना भीती वाटते आहे. आमिर खानसारख्या जाणत्या अभिनेत्याच्या पत्नीच्या मनात देश सोडून जावे की काय, अशी भावना निर्माण होते. शाहरुख खानसारख्या अभिनेत्याला भारतात असहिष्णुता वाढली आहे असे वाटते. ते उगीचच कसे वाटू शकेल? अर्थात ही केवळ काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

तुम्ही सत्तेत आल्या-आल्या मोठय़ा जोशात जनधन योजनेची सुरुवात केलीत. आज त्या योजनेची काय अवस्था आहे? त्या योजनेची खाती चालू ठेवण्याचा खर्च हा त्या योजनेच्या कोणत्याही फायद्यांपेक्षा जास्त आहे. ‘स्वच्छ भारत’सारखी योजना आपण गांधींच्या चष्म्यातून कधी अमलात आणूच शकला नाहीत. ती योजना प्रभावीपणे राबवलेली दिसत नाही. अनेक मोठय़ा व्यक्तींचे साफसफाई करतानाचे फोटो बाकी छान आले. ‘मेक इन इंडिया’बाबत आज कोणी बोलताना दिसत नाही. देशात उद्योग गुंतवणुकीचे वातावरण फलद्रूप होताना फारसे दिसत नाही.

पंतप्रधान महोदय, निश्चलनीकरणाचा अत्यंत धाडसी असा निर्णय आपण घेतलात. कोणालाही विश्वासात न घेता घेतलात. अगदी तुमच्या अर्थमंत्र्यांनाही तुम्ही सांगितले नाही असे बोलले जाते. जेटलींच्या जागी कोणी स्वाभिमानी व्यक्ती असती, तर राजीनामा देऊन घरी गेली असती. मात्र आपला धाक असा आहे, की काही बोलायलाच नको. सारा देश ढवळून निघाला होता त्या निर्णयाने. अनेक लोकांचे बँकांच्या रांगेत उभे राहून जीव गेले. मात्र आज आपल्या हाती शून्य उरलाय असेच सरकारी आकडे सांगत आहेत. जगभरातील अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीच्या निर्णयाला चुकीचे म्हटले, पण तुम्ही कोणाचेही ऐकले नाही. तुम्ही तुमच्या एका वेगळ्याच झोकात होतात. अमर्त्य सेन या नोबेलविजेत्या अर्थतज्ज्ञाने तर याला ‘आततायी कृती’ असे संबोधले. आज देशातील बाद नोटांपैकी ९९ टक्के नोटा पुन्हा बँकांत जमा झाल्या आहेत. माझ्यासारख्या नागरिकांना प्रश्न पडलाय – कुठे गेला काळा पैसा? काय साध्य झाले नोटाबंदीने?

नुकतेच अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. आपल्या या कल्पनेवर अनेक लोक टीका करीत असले, तरी मी व्यक्तिश: या कल्पनेचे मनापासून स्वागत करतो. २००६ साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मी मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन व्हावी ही कल्पना सादरीकरणाद्वारे मांडली होती, जेणेकरून एका अत्यंत समृद्ध भागाचा दुसऱ्या मागासलेल्या भागाशी संपर्क होऊन मागासलेल्या भागाच्या विकासाला चालना मिळेल. मात्र आताचे दळणवळण हे मुंबई व अहमदाबाद या दोन्ही प्रगत शहरांमध्ये होणार आहे. मुंबईला विदर्भाशी बुलेट ट्रेनने जोडले असते तर अधिक योग्य झाले असते, अशी माझी मनापासून भावना आहे. कारण त्यामुळे जशी प्रवासी वाहतूक ३५० किलोमीटर ताशी वेगाने झाली असती तशीच मालवाहतूक ताशी १६० किलोमीटर वेगाने झाली असती. मुंबई ते नागपूर हे ९०० किलोमीटरचे अंतर फक्त साडेतीन तासांत पूर्ण झाले असते. विदर्भासारख्या तुलनेने मागासलेल्या भागाच्या विकासाला त्यामुळे मोठी चालना मिळाली असती. बुलेट ट्रेन एकूण अंतरापैकी ७५ टक्के गुजरातमधून, तर २५ टक्के महाराष्ट्रातून जात आहे, तरीदेखील खर्चाचा पन्नास टक्के हिस्सा महाराष्ट्र उचलत आहे. अर्थात याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलतील अशी सुतराम शक्यता नाही. कारण एकदा आपल्या मनात आले, की या देशात कोणी काही बोलू शकत नाही.

पंतप्रधान महोदय, आपली सुरुवातीची काम करण्याची धडाडी आणि कर्तृत्व पाहून वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक लोक आपल्यासोबत काम करण्यास उत्सुक होते. मात्र आमचा भ्रमनिरास झाला आहे, हे मला आपल्याला सांगावे लागेल.

पंतप्रधान महोदय, आपले धारदार वक्तृत्व ही आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे. या वक्तृत्वाच्या जिवावर तर तुम्ही पंतप्रधानपद तुमच्याकडे खेचून आणलेत. आमच्या कोल्हापुरात आलात, तेव्हा तुम्ही म्हणाला होता की, ‘आम्ही सत्तेत आलो की सारा देश कोल्हापुरी चपला घालून फिरेल.’ तर आमच्या सोलापुरात तुम्ही ‘साऱ्या देशातील पोलिसांनी सोलापुरात शिवलेले कपडे घालायला हवेत,’ असे म्हटले होते. आता देश कुठे कोल्हापुरी चप्पल घालतोय? आमच्या सोलापुरातील लोकांना आजही आपले आश्वासन आठवत आहे.

मी हे पत्र लिहीत असताना कर्नाटकात गौरी लंकेश यांची हत्या झाली आहे. यावर तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने प्रतिक्रिया दिली की, ‘गौरी लंकेश या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात बोलल्या नसत्या, तर त्यांची हत्या झाली नसती.’ अक्षरश: सुन्न करणारी गोष्ट आहे ही. विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तीने हत्या केल्याची अप्रत्यक्ष कबुलीच भाजपचा आमदार देत आहे. या देशाने आणीबाणी पाहिली आहे. मात्र त्या काळातही अशा प्रकारची हत्यासत्रे कधी झाली नव्हती. एक प्रकारची अप्रत्यक्ष दमनकारी आणीबाणीच तुम्ही या देशावर लादली आहे.

आज ट्विटरवर ज्या १७७९ लोकांना आपण ‘फॉलो’ करत आहात, त्यापैकी जवळपास हजारभर लोक विरोधी विचारधारेच्या आणि लोकांबद्दल अत्यंत विषारी आणि अधूनमधून अश्लील लिखाण करणारे आहेत. तुम्ही ज्याला ‘फॉलो’ करत आहात, त्यापैकी एकाने गौरी लंकेश यांना त्यांच्या हत्येनंतर ‘कुत्री’ असे म्हटले. पंतप्रधान महोदय, अशा लोकांना फॉलो करून तुम्हाला नक्की कोणता संदेश जगाला द्यायचा आहे? ज्या पंडित नेहरूंची जागा आपण घेऊ  पाहात आहात, तुमच्या जागी जर ते असते तर त्यांनी ‘अशा’ समर्थकांना सर्वात कडक शिक्षा केली असती. आपल्या दोन दिवसीय म्यानमार दौऱ्यात आपण तब्बल वीस वेळा ट्वीट केले. मात्र सारा भारत त्याच वेळी गौरी लंकेश यांना श्रद्धांजली वाहत असताना, आपल्याला मात्र श्रद्धांजलीचे दोन शब्दही लिहावेसे वाटले नाहीत, हे विशेष. चित्रपटाच्या ‘प्रमोशन’साठी येणाऱ्या नटांना भेटायला आपल्याकडे वेळ आहे; मात्र दाभोलकर, पानसरे, अखलाख यांच्या कुटुंबीयांना भेटायला मात्र आपल्याकडे वेळ नाही. अदनान सामीच्या चार महिन्यांच्या बाळाला भेटायला आपल्याकडे चाळीस मिनिटे आहेत; मात्र गोरखपूरमध्ये जीव गमावलेल्या शेकडो कोवळ्या बाळांच्या मात्यापित्यांच्या डोक्यावरून हात फिरवायला आपल्याकडे चार मिनिटे नाहीत.

पंतप्रधान महोदय, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा बरखास्त करण्याचा आपला प्रयत्न म्हणजे संविधानाशी केलेला खेळच होता. न्यायालयाने त्याला वेळीच वेसण घातली हे बरे झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाला आणि तेथील बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यांच्या विरोधी विचारधारेच्या लोकांनी भरपूर बदनाम केले. काही लोकांनी तर बनावट व्हिडीयो तयार केले. विशिष्ट विचारधारेच्या लोकांची ही झुंडशाही म्हणजे ‘आयडिया ऑफ इंडिया’ नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.

हे पत्र लिहीत असताना निश्चलनीकरणाचे आकडे माझ्यासमोर आहेत. साऱ्या जगासमोर आपले हसू झाले आहे. नोटाबंदी अपयशी ठरली आहे. मनमोहन सिंगांसारख्या अर्थकारणातील भीष्म पितामहाने देशाच्या सर्वोच्च सदनात काढलेले शब्द खरे ठरले आहेत.

पंतप्रधान महोदय, आम्हाला हे प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे, की पंतप्रधान म्हणून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आपण अपयशी ठरला आहात. अजूनही वेळ गेलेली नाही. पुढील दोन वर्षांत आपण भारतीय जनतेला दाखवलेली स्वप्ने पूर्ण करू शकता. त्यासाठी पुढील दोन वर्षे आपण आटोकाट मेहनत घ्याल, अशी मी आशा करतो.

पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

***

आपलाच,

जयंत पाटील, आमदार