कोल्हापूर : ‘ऊस दर जाहीर झाल्याशिवाय ऊस तोड नाही’ या मागणीवरून विविध शेतकरी संघटनांनी पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्ट्यांमध्ये जागोजागी आंदोलन पेटवले आहे. ऊस तोड रोखणे, वाहतूक रोखणे, वाहनांचे नुकसान यापासून ते अशा दर जाहीर न केलेल्या साखर कारखान्यांवर मोर्चे काढण्याची आंदोलने सध्या सर्वत्र पेटली आहेत.
यामध्येही साखर सम्राटांच्या कारखान्यांना लक्ष्य केले जात आहे. ऊस दराचा मुद्दा शेतकरी संघटनांकडून तापवला जात असताना, दुसरीकडे शेतकरी संघटनांमधील अंतर्गत स्पर्धेचीही एक किनार आहे. याच वेळी साखर उद्योजकांना हंगाम सुरू कधी करायचा याचा पेच पडला असल्याने हंगामाची गुंतागुंत वाढत चालली आहे.
या वर्षीचा हंगाम लवकर सुरू व्हावा, असा राज्यातील साखर कारखानदारांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. बहुतेक साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावर ऊसतोडणी यंत्रणा दाखल झाली आहे. दिवाळी संपल्यानंतर हंगाम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. काही कारखान्यांनी ऊसतोड सुरू केली आहे. मात्र, ती सुरू होताच ऊस दरावरून शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.
कारखानदारांवर ‘अंकुश’
शिरोळचे आमदार, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घोडावत खांडसरी या गूळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्यात जाऊन ‘अंकुश’ या संघटनेने मागील हंगामातील प्रतिटन २०० रुपये आणि या हंगामासाठी ४ हजार रुपये दर दिल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नाही, असे सांगत ऊसतोड रोखली आहे. यातून पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. या कारवाईमुळे डगमगून न जाता आज मंगळवारीही जागोजागी ऊसतोड रोखण्याचा आदेश संघटनेचे प्रमुख अध्यक्ष धनाजी चडमुंगे यांनी दिला आहे.
‘स्वाभिमानी’ची निर्णयाला मुरड
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समरजित घाटगे यांच्या कागल तालुक्यातील शाहू साखर कारखान्याची ऊसतोड त्यांच्या कार्यक्षेत्रात रोखली आहे. ऊसतोड करणारी वाहने परत पाठवून दिली जात आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वातावरणनिर्मिती करण्याचाही शेतकरी संघटनेचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होऊन त्यामध्ये या वर्षीच्या ऊस गळीत हंगामासाठी प्रतिटन ३७५१ रुपये इतका दर देण्यात यावा. अन्यथा साखर कारखानदारांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
हंगाम सुरू झाल्यानंतर कारखानदारांनी मागणीप्रमाणे उसाची देयके न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी परिषदेत दिला होता. मात्र, हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आधीच्या निर्णयाला मुरड घालून ऊसतोड रोखायला सुरुवात केली आहे. याशिवाय मराठवाडा, अहिल्यानगर या जिल्ह्यांतील स्वाभिमानीच्या स्थानिक नेतृत्वाने एफआरपीप्रमाणे (उचित व लाभकारी मूल्य) देयके न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.
सात संघटनांचे ठिय्या आंदोलन
मागील हंगामातील ऊस दरासंदर्भात आणि या वर्षीच्या हंगामातील ऊस दर जाहीर न करता कारखाने सुरू केले असल्याने प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर आणि जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना मंगळवारी जय शिवराय किसान संघटना, शरद जोशी शेतकरी संघटना, शेतकरी सेना (शिंदे गट), बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, आप पार्टी, रयत संघटना (कर्नाटक ) यांनी निवेदन देऊन मागील हंगामाचा हिशेब हंगाम सुरू करण्यापूर्वी द्यावा अन्यथा ६ नोव्हेंबरपासून साखर सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला, अशी माहिती जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिली. विविध शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामाचा गुंता शासन, साखर कारखानदार कशा पद्धतीने हाताळणार याकडे लक्ष वेधले आहे.
