लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : केवळ चळवळीच्या आधारे पुढे जाता येण्याचे दिवस आता सरले आहेत. चळवळीशी जोडल्या गेलेल्या संघटनांना राजकारण करायचे असेल तर महायुती वा महाविकास आघाडी अशा मुख्य राजकीय प्रवाहातील घटकांशी जोडून घेणे हेच श्रेयस्कर ठरणार आहे, असे मत प्रा जालिंदर पाटील यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी गेली २५ वर्ष जोडले गेलेले प्रदेशाध्यक्ष प्रा. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हा संघटनेला आणखी एक धक्का बसला आहे.

कालपर्यंत महायुतीवर टीकास्त्र डागणारे प्रा. पाटील यांच्या भूमिकेत ३६० अंशाने बदल होऊन ते आता शिवसेनेचे घटक झाले असून प्रचारातही उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका गुरुवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढायला शिकवले. त्यातून अनेक लढाऊ कार्यकर्त्यांची फौज राज्यात तयार झाली. त्यांच्याशी फारकत घेत राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली. तेव्हा या संघटनेचे काम मी सुरू केले. शेती, शेतकऱ्यांशी संबंधित शेकडो आंदोलने केली. हजारो मैलांची पदयात्रा काढल्या. अनेकदा तुरुंगवास भोगला.

आणखी वाचा-कोल्हापुरात राजेश लाटकर आघाडीचे पुरस्कृत उमेदवार

अशा संघर्षमय परिस्थितीत संघटना चालवत असताना ‘स्वाभिमानी’ला काही प्रमाणात राजकीय यश मिळाले. आता राजकारणाचा पोत बदलला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन सक्षम, बलाढ्य पर्याय आहेत. त्यातून इतरांना राजकारणात प्रभावीपणे पुढे जाण्यासाठी संधी कमी आहे. २००९ सालच्या ‘रिडालोस’चीच आवृत्ती आताची तिसरी आघाडी आहे. आधी झाले तेच या तिसऱ्या आघाडीचे होणार हे उघड आहे. त्यामुळे मी राजू शेट्टी यांना महायुती – मविआ याच्याशी जोडून घेण्याचा पर्याय सुचवला होता. याबाबत मी शरद पवार यांच्यापासून अनेक मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. हा पर्याय शेट्टी यांना मान्य झाला नाही. आता त्यांनी शाहूवाडीत सरुडकर यांना पाठिंबा का दिला हे कळायला मार्ग नाही.

चळवळी निस्तेज होत चालल्या असल्या तरी राजू शेट्टी यांच्यासारखे एक आशादायक नेतृत्व आजही आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मी स्वाभिमानी संघटना सोडली आहे. मात्र येथून पुढे केवळ चळवळीचे सामाजिक काम किंवा थेट राजकारण यापैकी एक पर्याय स्वीकारला पाहिजे. एकाच वेळी या दुहेरी काटेरी वाटेवरून चालणे अडचणीचे आहे. त्यामुळेच मी शिवसेनेचे काम करण्याचे ठरवलेले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांची कृषी बिल माफ केले आहे. महत्त्वाचे अनेक निर्णय घेतले आहेत. याचे स्वागत केले पाहिजे. मी शिवसेनेत आलो असलो तरी शेती, शेतकरी संबंधित काही गैर होत असले तरी त्यावरही टीकेचे प्रहार केल्याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा-‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन

स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर, देवेंद्र भुयार यांसारख्या दुरावलेल्या जुन्या ताकदीच्या सहकाऱ्यांना जोडून घेऊन एकत्र काम करावे असा प्रस्ताव मी राजू शेट्टी यांच्यापुढे मांडला होता. त्यास त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिरोळमध्ये दूर गेलेले उल्हास पाटील चालत असतील तर हे सहकारी न चालण्यास काय अडचण आहे, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Movements need to connect with mainstream politics says jalinder patil mrj