Day-Night Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय भारतात दिवस-रात्र कसोटी किंवा पिंक बॉल टेस्टचे सामने आयोजित करू इच्छित नाही. अशाप्रकारचे दिवस- रात्र कसोटी सामने हे अवघ्या दोन-तीन दिवसांत संपतात, असे त्यामागचे कारण सांगितले जात आहे. या वेळी भारताच्या देशांतर्गत हंगामात, पुरुष आणि महिला संघांसाठी एकही दिवस- रात्र कसोटी सामना आयोजित केलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, “ते कसोटी सामने तीन दिवसांच्या पुढे जात नसल्यामुळे अशावेळी चाहत्यांचा प्रतिसाद फार कमी असतो.” ते पुढे म्हणाले की, “चाहत्यांना अशा सामन्यांमध्ये फारसा रस नाही. आम्हाला दिवस-रात्र कसोटी पाहण्याची चाहत्यांची आवड वाढवायची आहे. अशा कसोटी चार ते पाच दिवस चालण्याऐवजी दोन-तीन दिवसांत संपतात. भारतीय चाहत्यांना याची सवय झाली की मग आम्ही दिवस-रात्र कसोटीचे आयोजन करू.”

शाह म्हणाले, “ऑस्ट्रेलियाने गेल्या वेळी त्याचे आयोजन केले होते तेव्हापासून दिवस-रात्र अशी एकही कसोटी भारतीय संघाने खेळलेली नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी आमची बोलणी सुरू आहेत, मात्र आम्ही हळूहळू त्याची अंमलबजावणी करू. भारताने आतापर्यंत दिवस-रात्र असे चार कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी तीनमध्ये संघ विजयी झाला तर एकात पराभवाला सामोरे जावे लागले.”

हेही वाचा: टी-२० विश्वचषक आणि रोहित शर्माची फिटनेस याबाबत फिल्डिंग कोचचे सूचक विधान; म्हणाला, “ तो विराटसारखाच पण त्याचे वजन…”

भारतीय पुरुष संघाने आतापर्यंत बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला होता. त्याचवेळी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. अ‍ॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात टीम इंडिया केवळ ३६ धावांवर गारद झाली होती आणि तो सामना कांगारूंनी जिंकला होता. त्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून आणि श्रीलंकेविरुद्ध २३८ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना वगळता भारताने उरलेल्या तीन दिवस-रात्र कसोटी आपल्याच भूमीवर खेळल्या आहेत.

भारताने शेवटची दिवस-रात्र कसोटी बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध गुलाबी चेंडूने खेळली आणि अवघ्या तीन दिवसांत जिंकली. भारतीय महिला संघाची एकमेव दिवस-रात्र कसोटी ऑस्ट्रेलियात होती आणि ती २०२१ मध्ये खेळली गेली होती जी कसोटी अनिर्णित राहिली.

हेही वाचा: IND vs SA: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी दक्षिण आफ्रिकेच्या चिंतेत भर, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत

दिवस-रात्र कसोटीत भारताचा विक्रम चांगला

आगामी वर्ष २०२४ साठी पुरुष आणि महिला दोन्ही संघांच्या देशांतर्गत वेळापत्रकानुसार, एकही दिवस-रात्र कसोटी आयोजित केलेली नाही, ज्यामध्ये जानेवारी २०२४ मध्ये पाहुण्या इंग्लंड कसोटी संघाविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे. भारतातील दिवस-रात्र तीनही कसोटी या तीन दिवसांत संपल्या होत्या. फेब्रुवारी २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धची दिवस-रात्र कसोटी निराशाजनक ठरली कारण, सामना अवघ्या दोन दिवसांत संपला होता आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने १० गडी राखून विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India has a great record in pink ball test but bcci does not want to conduct day night test avw