गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अखेर सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं. यासोबत इतर काही आमदारांकडूनही विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त विधानं करण्यात आल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यावरून आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचे चांगलेच कान टोचले आहेत. बीडमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना, विशेषत: शिंदे गटाच्या आमदारांना धारेवर धरलं!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले अजित पवार?

“अतीवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. तिथल्या शेतकऱ्याला पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. त्याचं उत्तर देत नाहीत. त्याचं उत्तर द्या ना. सत्तेची मस्ती, नशा आणि धुंदी उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये आहे हे या सरकारनं लक्षात घ्यावं. आम्हीही लक्षात ठेवतो. आम्हीही काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. पण काय पद्धतीचं राजकारण सुरू आहे. तु्म्ही सांगितलं होतं लगेच पैसे देतो. दिले का पैसे?” असा सवाल अजित पवारांनी यावेळी केला.

वेदान्त प्रकरणावरून सत्ताधारी निशाण्यावर!

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यावेळी अजित पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. १५ जुलै रोजी नव्या सरकारच्या काळात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली होती, असं सांगताना अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. “आता म्हणतात मागच्या सरकारनं केलं. अरे मागच्या सरकारनं केलं हे काय सांगताय तोंड वर करून? १५ जुलैची मीटिंग झाल्याचं समोर आहे. काहीही बोलता काय? खोक्यानं जमलं म्हणजे सगळंच जमत नसतं. महाराष्ट्रातल्या तरुणांनी तर पेटून उठलं पाहिजे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

“हे सरकार केवळ अजित पवारांना घाबरतं” बीडमधील मेळाव्यात धनंजय मुंडेची तुफान फटकेबाजी!

“…हे तर आक्रितच झालं!”

सत्ताधारी आमदारांकडून केल्या जात असलेल्या विधानांचा यावेळी अजित पवारांनी समाचार घेतला. “गेल्या तीन महिन्यांत कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. सत्ताधारी पक्षाचेच आमदार मुंबईत गोळीबार करत आहेत. सरकारमधले आमदारच गोळीबार करत असतील तर जनतेनं न्याय मागायचा कुणाकडे? हे तर आक्रितच झालं”, असं ते म्हणाले.

“ते दोघंच कित्येक दिवस मंत्रिमंडळात होते, तेव्हा…”, अजित पवारांचा वेदान्त प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांना सवाल!

“कोण चुकीचं वागत असेल, तर त्यांना शासन केलं गेलं पाहिजे. पण तसं होत नाही. गोळीबार केला जातो. त्यांचे लोक शिवीगाळ करतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? काही तर आमदार हात-पाय तोडण्याची भाषा करतात. त्यांच्या मेळाव्यात आमदारानं सांगितलं विरोधकांचे हात-पाय तोडा. कुणी तुमच्यामागे आलं तर मी उभा आहे. अरे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे का? हे तुम्ही कसं बोलू शकता?” असा परखड सवाल अजित पवारांनी उपस्थित केला आहे.”इतर राज्यांमध्ये तशा घटना घडतात. पण महाराष्ट्राला त्या पातळीवर न्यायचंय का?” असंही ते म्हणाले.

“काही आमदार म्हणतात गिन गिन के, चुन चुन के मारेंगे.. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला काय करतंय आणि बाकीच्यांनी काय बांगड्या भरल्यात का? गिनता तरी येतं का?” असा खोचक सवालही अजित पवारांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar ncp slams cm eknath shinde devendra fadnavis on vedanta foxconn project pmw