Devendra Fadnavis Press Conference: विधानसभा निवडणूक निकालांनंतर आधी मुख्यमंत्रीपद, नंतर उपमुख्यमंत्रीपद, नंतर मंत्रीपद वाटप आणि शेवटी खातेवाटप या गोष्टी क्रमानं चर्चेत राहिल्या. त्या त्या वेळी अनेक राजकीय घडामोडींनंतर या गोष्टींबाबत निर्णय घेण्यात आले. आता यानंतर सत्ताधारी गोटात पालकमंत्रीपदांबाबत मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. ज्या आमदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळालं नाही, अशा नाराज आमदारांना पालकमंत्रीपदांच्या यादीत समाविष्ट करण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल असू शकेल. मात्र, असं असलं, तरी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका पालकमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांसाठीही तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये रस्सीखेंच पाहायला मिळत आहे. आमदारकीप्रमाणेच तिन्ही पक्षांमधील नेत्यांकडे आधी असणारी पालकमंत्रीपदं पुन्हा मागितली जात आहेत. या दाव्यांचा विचार करून सत्ताधारी पक्षांना पालकमंत्रीपदाच्या वाटपाबाबतचा निर्णय घ्यावा लागणार आहे. कोणत्या पक्षाला किती व कोणत्या जिल्ह्यांची पालकमंत्रीपदं मिळणार, यावर त्या त्या पक्षातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार हे ठरू शकेल. त्यामुळे याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच आता खुद्द देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवायला आवडेल, असं म्हटल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक राजकीय मुद्द्यांना उत्तरं दिली. यावेळी त्यांना पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षांमधल्या आमदारांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत विचारणा केली असता त्याबाबतचा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील, असं ते म्हणाले.

“पालकमंत्रीपदाबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निर्णय घेतील. त्यांनी मला बीडला पाठवलं तर बीडला जाईन. पण माझ्यामते साधारणपणे मुख्यमंत्री स्वत:कडे कोणतं पालकमंत्रीपद ठेवत नाहीत. पण माझी इच्छा अशी आहे की गडचिरोलीचं पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवावं. त्याला तिन्ही नेत्यांची परवानगी असेल तर ते होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

Devendra Fadnavis: गडकरी करणार फडणवीसांचा सत्कार, काय आहे कारण ?

अडीच वर्षं २०-२०, आता कसोटीचा सामना – फडणवीस

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या सत्ताकाळाला क्रिकेटच्या सामन्यांची उपमा दिली. “आम्ही तिघं सोबतच काम करत आहोत. अडीच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही २०-२० चा सामना खेळलो. तो विश्वचषक आम्ही जिंकलो. पण आता कसोटीचा सामना असणार आहे. हा सामना ड्रॉ होणार नसून आम्ही जिंकणारा सामना असेल”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis claims gadchiroli guardian minister post in nagpur press conference pmw