पंढरपूर : गेल्या अनेक वर्षांपासून असलेले सोलापूरकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. आता इथे लवकरच रात्रीची विमानसेवा, कार्गो सेवा सुरू करणार आहोत. सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू झाल्याने तीर्थक्षेत्र, उद्योगाला चालना मिळणार आहे. तसेच या विमानसेवेमुळे आय टी पार्क उभारण्यासाठी आता उद्योजक येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले.

तर देशात आपल्या राज्यात सर्वाधिक विमानसेवा सुरू झाल्या आहेत. लवकरच पालघर येथे समुद्राखाली विमानतळ सुरू करणार आहोत, असे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगीतले.

सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मेंघजी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, स्टार एअरचे संजय घोडावत, एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की विमानसेवेचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने आरसीएस सारखी योजना सुरू केली. राज्य सरकारने सोलापूरसाठी या योजनेंतर्गत विमानसेवेतील तूट भरून काढण्याचे मान्य केले. आरसीएसच्या माध्यमातून गॅप फंडिंग म्हणून १८ कोटींची रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर ही विमानसेवा सुरू होत आहे. सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून, जल वितरण वाहिनीसाठी एक हजार कोटींचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. जिल्ह्यात नवीन पोलीस ठाण्याच्या इमारती उभ्या राहत आहेत. पोलीसांच्या निवास स्थानासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पोलीसांना चांगल्या सुविधा दिल्यास त्यांची कामगिरी चांगली होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत चांगले काम केल्याबद्दल त्यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. संकटकाळी राज्य शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी असून, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत मोठे ३२ हजार कोटींचे पॅकेज शेतकर्‍यांसाठी देण्यात आले असून, महिना भरात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, की सोलापूर-मुंबई विमानसेवेची नागरिकांची मागणी पूर्ण होत आहे, ही सोलापूरकरांना दिवाळीची दिलेली भेट आहे. सोलापूर हे राज्यातील दक्षिण-पश्चिमेकडील महत्त्वाचा जिल्हा आहे. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर देशाच्या आर्थिक राजधानीला जोडले जात असल्याने उद्योग-शेती विकासाला चालना मिळून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. येत्या काळात हैद्राबाद आणि तिरूपतीसारख्या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील पहिले समुद्रातील विमानतळ पालघर येथे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पालकमंत्री गोरे म्हणाले, की सोलापूरचे नागरिक मुंबईसाठी विमानसेवेसाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे या विमानसेवेला प्रारंभ होत आहे. नुकत्याच झालेल्या महापूराच्या संकटाच्यावेळी प्रशासनाने चांगली कामगिरी करून जिवितहानी होऊ दिली नाही. ८७२ कोटी रुपयांचे शहराच्या अंतर्गत जलवाहिनीचे काम होणार आहे, असे गोरे म्हणाले. सोलापूर-तिरुपती विमानसेवा लवकर सुरू करावी आणि शहर विकास आराखड्याचे काम लवकर व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लाडक्या बहिणींना दिवाळी भाऊबीज

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना संपूर्ण अन्नधान्य व दिवाळी किट मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळ परिसरात करण्यात आला.